अजित पवारांनी बोलावली बैठक
पुणे – तब्बल सहा वर्षांपासून रखडलेला भामा-आसखेड प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. 85 टक्के काम पूर्ण झालेली ही योजना पुन्हा गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे हे काम तातडीने सुरू व्हावे, यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शनिवारी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाची बैठक बोलावली आहे.
या योजनेतून शहराच्या पूर्व भागाला तब्बल अडीच टीएमसी पाणी मिळणार आहे. त्यामुळे या भागातील गेल्या अनेक वर्षांची पाणी समस्या संपुष्टात येणार आहे. महापालिका प्रशासनाने 2013 मध्ये तब्बल 374 कोटींच्या योजनेचे काम सुरू केले होते. डिसेंबर 2016 मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, योजनेला धरणग्रस्तांनी केलेला विरोध, तसेच जलवाहिनीला झालेल्या विरोधामुळे गेल्या सहा वर्षांपासून या योजनेचे काम सुरू आहे.
तर या सहा वर्षांत जवळपास साडेतीन वर्ष हे काम वेगवेगळ्या कारणास्तव बंद पडलेले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्चही जवळपास 40 कोटींनी वाढला आहे. दरम्यान, अजित पवार यांनी याबाबत बैठक घेऊन तोडगा काढण्याची मागणी वडगाव शेरीचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी केली होती. त्यानुसार पवार यांनी आज शनिवारी कालवा समितीच्या बैठकीपूर्वी सकाळी साडेअकरा वाजता विभागीय आयुक्त कार्यालय भामा-आसखेड योजनेची आढावा बैठक बोलवली आहे.
रखडलेल्या भामा-आसखेड योजनेबाबत बैठक घेण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पहिल्याच बैठकीत अजित पवार यांच्याकडे केली होती, त्यानुसार ही बैठक होत आहे. योजना मार्गी लावून पूर्व भागाचा पाणी प्रश्न निश्चितपणे सोडवला जाईल.
– सुनील टिंगरे, आमदार, वडगावशेरी