मेलबर्न : महिलांच्या नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीला एक करोना विषाणूची लागण झालेला एक रुग्ण सामना पाहण्यासाठी उपस्थित असल्याचे समोर आले आहे. आता या व्यक्तीला शोधून काढून त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात असून त्वरित उपाययोजना करण्यात येतील असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या स्पर्धेचा अंतिम सामना गेल्या 8 मार्चला मेलबर्न मैदानावर झाला होता. या सामन्याला जवळपास 90 हजार क्रिकेट चाहत्यांनी उपस्थिती लावली होती. त्यात अ 42 क्रमांकाच्या आसनावर बसला होता हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, चीनसह जगभरात पसरत असलेल्या करोना विषाणूंमुळे क्रीडा क्षेत्राला चांगलाच फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. या विषाणूंचा प्रसार तसूभरही कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याने जपानमधील ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्याची तसेच रद्ददेखील करण्याची मागणी पुढे येत आहे.सध्या तरी करोनावर निश्चित उपचार उपलब्ध झालेला नसल्याने व चीनसह जवळपास 100 देशांमध्ये या विषाणूचे रुग्ण आढळल्याने जागतिक आरोग्य संघटनेने या करोना विषाणूला महामारी घोषित केले आहे.