पुणे – नेत्रहीन व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणाऱ्या “नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड’तील विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले आहे.
दृष्टीच्या अभावामुळे अध्ययनात, अभ्यासात अडचणी येतातच, त्या येणं स्वाभाविकच आहे. पण संस्थेने केलेले सर्वतोपरी सहकार्य व मार्गदर्शनामुळे बारावीच्या अभ्यासामध्ये चांगला फायदा झाला, अशी भावना नेत्रहीन विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
सुदाम गारोळे 82.61 टक्के, लक्ष्मीकांत कांबळे 80 टक्के, राहुल गळवे 78 टक्के, घनश्याम ढगे 76.15 टक्के, पांडुरंग अलटवाड 75.53 टक्के तर विशाल क्षीरसागर 60 टक्के गुणांनी यशस्वी झाले. “संस्थेने आमची राहण्याची जेवणाची मोफत सोय संस्थेच्या वसतिगृहात केली. एवढेच नसून आम्हाला शिस्त लावली. सगळ्या प्रकारचे क्लासेस उपलब्ध करून दिले.
विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्यामुळे हे यश मिळवणं शक्य झालं, अशी प्रतिक्रिया नेत्रहीन विद्यार्थ्यांनी दिली.
नेत्रहीन विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय आपले आई-वडील, शिक्षक, संस्थेचे सर्व कर्मचारी, संस्थेचे अध्यक्ष राहुल देशमुख व विश्वस्त देवता अंदुरे-देशमुख यांना दिले.
“सर्व नेत्रहिन विद्यार्थी आपल्या काळोखमय आयुष्याच्या वाटा उज्वल करण्यासाठी, आपल्या आयुष्यातील काळोख दूर करण्यासाठी अविरत धडपडत आहेत. उंच भरारी घेण्यासाठी ते सगळेजण सज्ज झाले आहेत. गरज आहे ती फक्त समाजाच्या मदतीची, सहकार्याची, असे मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी केले.