सत्येंद्र राठी
जुन्या जमान्यातील लोकप्रिय गीतकार, कवी, शायर हसरत जयपुरी यांची जन्मशताब्दी नुकतीच सुरू झाली आहे.त्यांच्या जीवन प्रवासावर टाकलेला दृष्टिक्षेप…
संगीतकाराने बनविलेली चाल, मग ती अनवट असो किंवा अवघड; त्यावर आपले सहज, सरळ, सोपे शब्द असे आरूढ करायचे की श्रोत्यांनी ते गाणं गुणगुणायला हवेच, ही किमया साध्य करणाऱ्या गीतकारात अगत्याने येणारे नाव म्हणजे “हसरत जयपुरी’.
बहारों फूल बरसाओ मेरा मेहबूब आया है… मागील पंचावन्न वर्षे भारतीय लग्नसोहळ्यात न चुकता वाजविले जाणाऱ्या या गाण्यावरून “हसरत’ यांची शब्दांवरची पकड आणि निवड याचा अंदाज घेता येऊ शकेल. हिंदी सिनेसृष्टीत दीर्घकाळ अवीट शब्दांची पखरण करणाऱ्या जुन्या पिढीतील या शायरच्या जन्मशताब्दी वर्ष. जयपूर हे त्यांचे मूळ गाव.
इकबाल हुसेन हे त्यांचे खरे नाव, तर “हसरत’ हे त्यांचे तखल्लस! शिक्षण इंग्रजीत होत असतानाही पर्शियन आणि उर्दूचे मिळत गेलेले धडे, शायर असलेल्या आजोबांची तालीम, कोवळ्या वयात झालेले प्रेम, एकूणच त्यांना शायर बनविण्यास पोषक ठरलं. जिच्यावर हसरतचं प्रेम होतं ती मुलगी त्यांच्या घरासमोरच राहात असे. राधा तिचे नाव, तिच्या प्रेमात हसरतनी आपल्या जीवनातील पहिलावहिला शेर रचला.
“तू झरोंखे से जो झॉंके तो मैं इतना पूछूं,
मेरे महबूब तुझे प्यार करूं या न करूं।’
पण त्यांच्या प्रेमाला गती मात्र लाभली नाही. ते खिन्न झाले. त्यात आईला त्यांचे शायर असणेही पसंत नव्हते. एकूणच घरच्यांशी बेबनाव आणि दुभंगलेल्या प्रेमाचे सल उरी बाळगत हसरत यांनी मुंबई गाठली. या मायानगरीत पडेल ते काम करत, प्रसंगी फुटपाथवर खेळणी विकत त्यांचा जगण्याचा संघर्ष सुरू झाला. दरम्यान, त्यांना बस कंडक्टरची नोकरी मिळाली. सौंदर्याचे उपासक असलेले “हसरत’ बसमध्ये प्रवास करणाऱ्या सुंदर तरुणीकडून तिकीट घेत नसत.
ते म्हणत, मेरे देखने के लिए ही अल्लाहने इन्हें जमीं पर भेजा हैं, इनसे टिकट कैसे लूँ?
दिवसभराच्या जबाबदाऱ्या उरकून, ते रात्री मुशायऱ्यालाही जात. अशाच एका मुशायऱ्याला त्यांना पृथ्वीराज कपूर यांनी ऐकले. त्यांच्या शायरीने प्रभावित होत त्यांनी “हसरत’ यांना राज कपूरना भेटायला सांगितले. राज कपूर तेव्हा “बरसात’ची जुळवणी करीत होते.
त्यांना चालीवर गाणी लिहिणारा गीतकार हवा होता. हसरत राज कपूरकडे गेले. राज कपूरनी त्यांना प्रसंग समजाविला, चाल दाखविली आणि गाणे लिहिण्यास सांगितले. हसरतनी शब्द दिले, जिया बेकरार हैं छायी बहार हैं, आजा मोरे बालमा, तेरा इंतजार हैं। बरसातच्या या गाण्याने सिनेसृष्टीत धुमाकूळ घातला. राज कपूर बेहद खूश झाले. राज कपूर त्यांनी हसरतला आपल्या चमूत सामील करून घेतले. शंकर जयकिशन यांनी संगीत दिलेले हे पहिलेच गाणे.
आर. के. बॅनरच्या सिनेमांसाठी हसरतची लेखणी धावू लागली. गीतकार शैलेंद्र यांचीही त्यांना साथ होती. आवारा, श्री 420, चोरीचोरी, अनाडी, जिस देश में गंगा बहती है, बूट पॉलिश, संगम अशा अनेक सुपर हिट सिनेमांव्यतिरिक्त, इतर निर्मात्यांसाठीही एकाहून एक सरस अशी गाणी “हसरत’नी लिहिली.
त्या काळी मोठ्या बजेटच्या सिनेमांना हसरत यांचीच गाणी असत. सिनेमाचे शीर्षक गीत लिहिण्यात त्यांचा विशेष हातखंडा. हरियाली और रास्ता, दिल एक मंदिर, तेरे घर के सामने, जब प्यार किसी से होता है, मेरे हुजूर, इन इव्हिनिंग इन पॅरिस, गुमनाम, तुमसे अच्छा कौन है अशा अनेक सिनेमांचे त्यांनी लिहिलेले शीर्षकगीत आजही रसिकांना ठेका धरायला प्रवृत्त करतात. शायरी हा त्यांचा मूळ पिंड, त्यामुळे सिनेजगतात वावरतानाही त्यांनी शायरीस कधीच अंतर दिले नाही.
“वो अपने चेहरे में सौ आफताब रखते हैं,
इसीलिए तो वो रुख पर नकाब रखते हैं।’
त्यांनी उर्दू साहित्य क्षेत्रातही आपले वर्चस्व राखले. त्यांचा “आबशार-ए-गजल’ हा शायरीसंग्रह जगप्रसिद्ध आहे. सर्वात जास्त पुरस्कार मिळवणारे गीतकार असाही त्यांचा त्याकाळी लौकिक होता.
ये मेरा प्रेमपत्र पढकर, के तुम नाराज ना होना… संगम सिनेमासाठी लिहिलेले हे गीत खरं तर त्यांनी आपल्या प्रेमिका राधासाठी लिहिले होते. अत्यंत लोकप्रिय ठरलेलं हे गाणं, त्या काळी प्रेमिकांसाठी प्रेम व्यक्त करण्याचे साधन ठरले. तीच गोष्ट “तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे’ या गाण्याची, ही रचना त्यांनी त्यांचा मुलगा अर्थात अख्तरला उद्देशून केली होती, जी नंतर ससुरालमध्ये घेण्यात आली.
1966 मध्ये प्रदर्शित सूरजच्या “बहारों फूल बरसाओ’ आणि 1971 च्या अंदाजच्या “जिंदगी एक सफर हैं सुहाना’, या गाण्यांनी त्यांना फिल्म फेअर पुरस्कार मिळवून दिला. वर्ल्ड युनिव्हर्सिटी राउंड टेबलने त्यांना डॉक्टरेट बहाल केली. उर्दू कॉन्फरन्सच्या वतीने “जोश मलीहाबादी’ नावाने पुरस्कार देण्यात आला. जीवनात सलग सारखं काही नसतं, राज कपूर यांच्या महत्त्वाकांक्षी सिनेमा “मेरा नाम जोकर’ने सपाटून मार खाल्ल्यामुळे आर. के. बॅनर डबघाईला आले. वीस वर्षांची सोबत सोडत, राज कपूर यांनी हसरतच्या जागी आनंद बक्षींना आणले. हसरत काळवंडले. नंतरच्या बॉबीपासून आर. के. बॅनर परत दुमदुमू लागले; पण हसरत त्यात नव्हते.
आधी गीतकार शैलेंद्र यांचे निधन, मग संगीतकार जयकिशन यांच्या जाण्याने हसरत काहीसे मागे पडले. सिनेसृष्टीत उगवतीला नमस्कार करण्याचा रिवाज आहे. जवळपास बारा वर्षांनंतर “राम तेरी गंगा मैली’च्या निमित्ताने अपघाताने का होईना, ते दोघे पुन्हा एकत्र आले; आणि हसरतने “सुन सुन साहीबा सुन, प्यार की धून…’ गाणं लिहिलं. या सिनेमाचे संगीतकार रवींद्र जैन खरं तर स्वरचित गीतच सिनेमात घेत, पण त्यांनाही या शब्दावलीचा मोह आवरता आला नाही.
हे गाणे तुफान गाजले. आर. के. च्या “हिना’साठीही त्यांनी गाणी लिहिली; पण एव्हाना काळ बदलला होता, नवे रक्त जागा घेऊ पाहात होते. अंदाजे तीनएकशे सिनेमांसाठी हसरतने जवळपास दोन हजार गाणी लिहिली. शेवटच्या काळी त्यांनी स्वतःला शायरी संग्रहात व्यस्त करून घेतले; पण ते पूर्ण होण्याची “हसरत’ पूर्ण न होता “हसरत’ यांनी 17 सप्टेंबर 1999 रोजी जगाचा निरोप घेतला तो मी सदैव आठवणीत राहीन असे सांगत. जाताना आपले अस्तित्व आपल्या ओळीत रेखाटून गेले की, तुम मुझे यूँ भूला न पाओगे, जब कभी सुनोगे गीत मेरे संग संग तुम भी गुनगुनाओंगे…