पुणे – सांगली, कराड, मिरज, पंढरपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. या भागांतील प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दि.8 पासून पुढील तीन दिवस विशेष गाडी धावणार आहे.
ही गाडी गुरुवारी दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी मिरज स्थानकातून सुटून दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी कराड येथे पोहोचणार आहे. तर कराड स्थानकातून दुपारी 2 वाजता ही गाडी सुटून 3 वाजून 40 मिनिटांनी मिरज येथे पोहोचणार आहे.
त्यामुळे प्रवाशांना मिरज स्थानकातून सोलापूर-पंढरपूर एक्स्प्रेस गाडी पकडता येणार आहे. परिणामी, या भागांतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.