पुणे – मध्य रेल्वेकडून एप्रिल महिन्यात विशेष गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. पुण्याहून काझीपेट, भुसावळसह मुंबई-चेन्नईदरम्यान विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. मात्र, या गप्रवास करण्यासाठी आरक्षण करणे आवश्यक असेल.
नियमित प्रवासी रेल्वे गाड्यांची सेवा अद्यापही स्थगित असल्याने रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. दिवसेंदिवस प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार गाड्यांची संख्या देखील वाढवण्यात येत आहे.
9 एप्रिलपासून पुणे ते काझीपेट या मार्गावर दर शुक्रवारी रात्री 10 वाजता सुटणार असून, ही गाडी काझीपेट येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7.20 वाजता पोहोचणार आहे. तर काझीपेट येथून 2 मेपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर रविवारी दुपारी गाडी सुटणार असून, ती पुण्यात दुसऱ्या दिवशी सकाळी 10.50 वाजता पोहोचणार आहे.
ही गाडी दौंड कॉर्डलाइन, नगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धामार्गे धावणार आहे. तर सीएसएमटी-चेन्नई ही गाडी 10 एप्रिलपासून आणि चेन्नई-सीएसएमटी ही गाडी 11 एप्रिलपासून धावणार आहे. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, खडकी, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, सोलापूरमार्गे धावणार आहे.
पुणे-भुसावळ-पुणे गाडी मनमाड-दौंड कॉर्डमार्गे धावणार
रेल्वे प्रशासनाने पुणे-भुसावळ मार्गावर एप्रिल महिन्यात मर्यादित दिवशी मनमाड-दौंड कॉर्डलाइन मार्गे विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याहून 16 आणि 30 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता सुटणार असून, ही गाडी रात्री 8.45 वाजता भुसावळ येथे पोहोचेल. तर भुसावळ-पुणे विशेष गाडी 15 आणि 29 एप्रिल रोजी सकाळी 6.15 वाजता सुटणार आहे. सायंकाळी 4.45 वाजता पुणे येथे पोहोचणार आहे. उरुळी, दौंड कॉर्डलाइन, नगर, बेलापूर आदी स्थानकांवर गाडी थांबणार आहे.