राष्ट्रपती रामनाथ कोविंद : आयएनएस शिवाजी संस्थेला “प्रेसिडेंट कलर’ हा सर्वोच्च सन्मान
पुणे – आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे स्थान उंचावत आहे. व्यापार, सुरक्षा अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर भारताची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. जगातील बहुतांश व्यापार हा समुद्री मार्गातूनच होत असतो. अशा स्थितीत नौदलाचे कार्य महत्त्वपूर्ण ठरते. महत्त्वपूर्ण व्यापारी मार्ग असलेला आशियायी प्रशांत महासागरात भारतीय नौदलाच्या विशेष देखरेखीची आवश्यकता असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अधोरेखित केले.
नौदल अभियांत्रिकी प्रशिक्षण संस्था, लोणावळा येथील आयएनएस शिवाजी संस्थेला यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. गेली 75 वर्षे नौदलासाठी सेवारत असलेल्या संस्थेच्या कार्याचा गौरव करण्यासाठी “प्रेसिडेंट कलर’ हा सर्वोच्च सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते बहाल करण्यात आला. आयएनएस शिवाजी येथे गुरुवारी लष्करी सन्मानाने राष्ट्रपतींच्या हस्ते हा सन्मान प्रदान केला. संस्थेचे निशाण अधिकारी लेफ्टनंट कमांडर रोशन कुमार सिंग यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, नौदल प्रमुख ऍडमिरल करमबिर सिंह, नौदलाच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख व्हाइस ऍडमिरल अनिल कुमार चावला, आयएनएस शिवाजीचे प्रमुख कमोडोर रवनीश सेठ उपस्थित होते.
राष्ट्रपती कोविंद म्हणाले, “एखाद्या राष्ट्राची सागरी सुरक्षा ही त्याच्या अर्थकारणाशी निगडित असते. जगभरातील बहुतांश व्यापार हा समुद्री मार्गाद्वारे होत असल्याने सागरी सुरक्षेबरोबरच अर्थकारणाच्या वृद्धीमध्येही नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. जागतिक व्यापाराचा महत्त्वपूर्ण समुद्री मार्ग असलेल्या आशियायी प्रशांत महासागरात भारतीय नौदल नेहमीच तैनात असते. मात्र, या परिसरात अधिक देखरेख आवश्यक असून, त्यादृष्टीने नौदल कार्यरत राहीन, असा मला विश्वास आहे.’
आयएनएस शिवाजीच्या जवानांचे शानदार संचलन
राष्ट्रपती निशाण प्रदान सोहळ्याप्रसंगी संस्थेच्या जवानांनी दिमाखदार संचलन करत राष्ट्रपतींना मानवंदना देत राष्ट्रपती निशानाचा स्वीकार केला. राष्ट्रपती निशाण देण्याआधी सर्वधर्मिय प्रार्थना करण्यात आली. यानंतर राष्ट्रपतींनी ध्वज लेफ्टनंट कमांडर रोशन कुमार सिंग यांच्या हाती दिला. यानंतर नौदलाच्या बॅंडच्या तालावर “कदम कदम बढाये जा’ या गाण्याच्या धुनवर जवानांनी संचलन करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या सोहळ्यात नौदलाचे 130 अधिकारी आणि 630 नाविक सहभागी झाले. तर, राष्ट्रपतींना 150 जवानांकडून “गार्ड ऑफ ऑनर’ दिला गेला. कॅप्टन कमांडन्ट निलेश कोषी जॉर्ज याने संचलनाचे नेतृत्व केले.
…असे आहे राष्ट्रपतींचे निशाण
सात फुट ऊंच आणि पांढऱ्या रंगाच्या या निशानावर भारतीय ध्वजासह नौदलाचा ध्वज आहे. या ध्वजाच्या वर रेशीम धाग्यांनी सुवर्ण सिंह मुद्रा रेखाटण्यात आल्या आहेत. पूर्वी युद्धात जिंकल्यावर संबंधित ठिकाणी ध्वज लावण्यात येत होता. हा ध्वज विजयाचे प्रतिक असायचा. ब्रिटीशांच्या काळापासून ही परंपरा सुरू आहे. भारतानेही ही पद्धत कायम ठेवली. भारतीय सैन्य दले आणि संस्था यांनी युद्धकाळ आणि शांततेच्या काळात केलेल्या कामगिरीची दखल घेऊन देशाचे सर्वोच्च सेनापती असलेल्या राष्ट्रपतींकडून ध्वज देऊन त्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते. यानंतर संस्थेच्या प्रत्येक संचलनात हा मानाच्या ध्वज वापरण्यात येतो.