-रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर (प्रतिनिधी) : जगाला करोना संसर्गाच्या भीतीने ग्रासले आहे. मरणाच्या भीतीने अनेकजण सुरक्षित राहण्याची काळजी घेत आहेत किंवा तशी धडपड करीत आहेत. सर्वसामान्य लोकानी लॉकडाऊन मध्ये बंद दरवाजा आड स्वत:ला कोंडून घेतले आहे. अशाही स्थितीत पोटासाठी कच-याच्या ढिगात काहीतरी सापडेल या आशेने ‘ती’ उमलती फुले दुर्गंधीच्या राशीवर बसून जगण्याचा सुगंध शोधीत असल्याचे चित्र राजगुरुनगर मध्ये पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला असलेल्या कचरा डेपोत पाहायला मिळत आहे.
इयत्ता दहावीच्या जुन्या अभ्यासक्रमात “स्मशानातील सोन” ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची लिखित कथा अनेकांनी वाचली. जगण्यातले भयाण वास्तव या कथेत आहे. जगाला कोरोना आजाराने ग्रासल्याच्या पार्श्वभूमीवर त्याहूनही भयंकर असा प्रकार राजगुरुनगर शहरात गेले अनेक दिवस सुरु आहे.काहीतरी मिळेल या आशेने पछाडलेली सुमारे ५ ते १२ वर्ष वयोगटातील मुले दिवसभर कच-याच्या ढिगावर बसून आहेत.देशोदेशीच्या श्रीमंतांची मोजदाद,त्यांचे खालीवर होणारे मानांकन याची चर्चा नेहमी होते.मात्र जगात असेही अनेक लोक आहेत की ज्याना उद्या येणा-या मरणा पेक्षा आजच्या जेवणाचीच काळजी अधिक असल्याचे या प्रकारातून प्रकर्षाने जाणवते.
शहरा जवळच्या चांडोली गावात कातकरी वस्ती आहे.तेथील मुलांची ही अवस्था आहे.लॉकडाऊनच्या काळात शासना कडून या लोकांची मुलाबाळांसहित जेवणाची व्यवस्था केली आहे.मात्र तरीही हक्काचे व कष्टाचे मिळवण्या करीता ही मुले कचरा घेऊन येणाऱ्या गाड्यांची वाट पाहात असतात. आज कोणी देईल, उद्याचे काय? हा प्रश्न सोडवायला या परिवारातील मुले कच-याच्या ढिगावर आपले भविष्य शोधताना नेहमीच आढळून येतात.
राजगुरुनगर शहरातून गोळा होणारा रोजचा कचरा पुणे नासिक महामार्गालगतच्या पोलीस ठाण्या मागील जागेत जमा होतो.तिथे वर्गीकरण करून विल्हेवाट लावण्यासाठी दुसरीकडे नेला जातो.हे सर्व होत असताना येथे कचऱ्याचा डोंगर उभा राहतो.या परिसरात मोठी दुर्गंधी पसरलेली असते.कर्मचारी तोंडाला सुरक्षित मास्क,रुमाल बांधून असतात.तर येथून ये-जा करणारे नाक हातात धरूनच पुढे जातात.असे असताना चांडोली येथील कातकरी वस्तीतील लहान लहान मुले या कच-यातून काही मिळते का? याचा शोध नेहमीच घेत असतात.खाद्यपदार्थ, मौल्यवान वस्तू, प्लॅस्टिक,फेकुन दिलेली खेळणी अशा वस्तूंचा शोध त्यांची नजर घेत असते.
नाका,तोंडासाठी कोणतीही सुरक्षा नाही,पायात चप्पल नाही अशा अवस्थेत ही चिमणी पाखरं कचरा घेऊन येणा-या गाडीची चातक पक्षा प्रमाणे वाट पाहात असतात. काही सापडेल या हेतूने अपघाताचा धोका पत्करून त्या वाहनाच्या जवळ जाऊन घोळका करतात.कचरा खाली झाला की तो थेट हाताने चाळून बघतात.त्यातही त्यांची चढाओढ असतेच.लॉकडाऊनच्या धाकाने सर्वांवर सुरक्षित राहण्याची सक्ती करणाऱ्या सर्वच शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्यांच्याकडे दुर्दैवाने दुर्लक्ष आहे.