विलास पंढरी
जबाबदारी आणि प्रेमाची पवित्र भावना जपणारा आजचा सण म्हणजे रक्षाबंधन.
सणांची रेलचेल बघता श्रावण महिन्याला सणांचा राजाच म्हणावा लागेल. श्रावणातील प्रत्येक मंगळवारी येणारी मंगळागौर, याच महिन्यातील सोमवारांचे शिवभक्तांना असलेले महत्त्व, नागपंचमी, रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा, श्रीकृष्णजन्माष्टमी, दहीहंडी आणि शेवटी येणारा बैलपोळा व पिठोरी अमावास्या अशी सणाची रेलचेल तर असतेच,
पण पाऊस पडत असल्याने हिरवागार शालू नेसलेला निसर्गही सणांचा आनंद द्विगुणित करीत असतो. त्यातीलच एक जबाबदारी आणि प्रेमाची पवित्र भावना जपणारा आजचा सण म्हणजे रक्षाबंधन.
सामाजिक दृष्टीने गढूळ होऊ पाहणाऱ्या हल्लीच्या वातावरणात रक्षाबंधनाचा सण महत्त्वाचा आहे. रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हटले आहे. या विधीस “पवित्रारोपण’ असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा आणि आपल्या भावाने आपले रक्षण करावे,
ही यामागची मंगल भावना असते. उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो अशी कामना करते. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे.
दक्षिण भारतात कार्तिकेय सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे एक निमित्त आहे. ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमायून बादशहाला राखी पाठवली व हुमायून बादशहाने पण आपल्या या बहिणीचे परकीय आक्रमणापासून संरक्षण केले होते.
राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वत:ला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो. राखी बंधनाच्या या सणातून मित्रत्व, स्नेह व परस्पर प्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. स्त्रिया आपल्या शत्रूंच्या हातात राखी बांधून पुढे होणारा भयंकर संहार टाळीत असत व एकप्रकारे राखीचा उपयोग अहिंसेसाठी करीत असत.
राखीचा धागा हा नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुरुषार्थाचे पवित्र बंधन आहे. या एवढ्याशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो व मन प्रफुल्लित होते. एकमेकांना जोडणारा असा हा सण आहे. सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्त्वाचे ठरतात.
रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास या सणामुळे वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो, हाच या राखीपौर्णिमेचा संदेश आहे.लहानपणी खाऊ आणि खेळणी यांच्या वाटणीवरून, आईच्या बाजूला कोण झोपणार यावरून भांडणारे ताई-दादा लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष भेटता येत नसले तरी आता परस्परांना ई-पत्र, फोन किंवा चॅटद्वारे भेटण्याचा व राखीपौर्णिमा एकत्र साजरा करण्याचा आनंद उपभोगत आहेत.
नारळी पौर्णिमा
देशातील कोळी समाजाच्या दृष्टीने या नारळी पौर्णिमेचे वेगळे महत्त्व आहे. श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे बांधव नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. या दिवशी सागराला श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची कोळी बांधवांची प्रथा आहे.
समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते. या सागरसंचार करणाऱ्यांनी वर्षाकालीन क्षुब्ध सागरावर जाणे थांबवलेले असते. माशांच्या प्रजननाचा काळ असल्याने मासेमारी थांबवलेली असते.
या श्रावण पौर्णिमेस सागरपूजन झाले की समुद्रात होड्या घेऊन मासेमारी सुरू होते. वर्षानुवर्षे हा नियम कटाक्षाने पाळला जात आहे. गोड धोड केल्याशिवाय आपला सण साजरा होत नाही. नारळी पौर्णिमा संबोधल्या जाणाऱ्या या पौर्णिमेला स्वादिष्ट अशा ओल्या नारळाचा गोड भात करण्याची महाराष्ट्रात प्रथा आहे.
द्रौपदीने आपल्या मानलेल्या भावाला (कृष्णाला) बांधलेला जरतारी शेल्याचा तुकडा असो की, गरीब बहिणीने भावाच्या हातात बांधलेला धागा किंवा शाळकरी ताईने तयार केलेली राखी, एखाद्या राजाला पाठवलेले राखीचे ताट, श्रीमंत बहिणीने भावाला बांधलेली सोन्याची किंवा
चांदीची राखी काय किंवा आजकालच्या लॉकडाऊनमुळे इंटरनेटच्या माध्यमातून बहिणीने भावाला पाठवलेली ई-शुभेच्छापत्ररूपी राखी काय, या सर्वांमागे भावना एकच आहे ती म्हणजे भावाबहिणींचे परस्परांवरील प्रेम. रक्षाबंधनानिमित्ताने देशात सौहार्दाचे, भाईचाऱ्याचे आणि सहिष्णुतेचे वातावरण तयार व्हावे.