नगर -संपूर्ण जगावर करोना विषाणूचे महासंकट ओढवले आहे. अशाकाळात सामान्य माणसाला धीण देण्याची खूप मोठी गरज आहे. म्हणून संकटकाळातच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांची विशेष गरज असल्याचे विचार आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
एमआयडीसीमधील वर्षा उद्योग समूह व आदित्य सेल्स यांच्यातर्फे बुथ हॉस्पीटल व गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये सेवा करणाऱ्यांसाठी एक हजार पीपीई कीट मदत म्हणून देण्यात आल्या. त्या स्वीकारताना आमदार जगताप बोलत होते.
विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, माजी नगरसेवक ऍड. धनंजय जाधव, निखिल लुणिया, आदित्य गुजराथी, निखिल वारे, विनीत पाऊलबुद्धे, बाळासाहेब पवार, अजिंक्य बोरकर, कमलेश चंगेडिया, राजेश गुगळे, प्रताप काळे, अजय पोटे, राहुल मुथा, धीरज संसारे, आकाश थोरात, महेश महादर, रुपेश येनगुपटला आदी यावेळी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, “”शहरात करोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची काळजी वाढत चालली आहे. प्रत्येकाने करोना संसर्ग होऊ नये, यासाठी स्वत:च जास्त काळजी घेण्याची गरज आहे.
अशावेळी करोनाबाधितांची काळजी घेणाऱ्यांचीही काळजी घ्यावी लागेल. म्हणूनच वर्षा उद्योग समूह व आदित्य सेल यांच्या उपक्रमाचे कौतुक करावे लागेल. त्यांच्या कार्याचा इतरांनी आदर्श घ्यावा.” ऍड. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. करोना योद्धांच्या आरोग्याची काळजीही घ्यावी लागेल. ते प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.