महाबळेश्वर – कोयना धरण बाधित प्रकल्पग्रस्तांमध्ये महाबळेश्वर तालुक्यातील 44 गावांचा समावेश असून अद्यापपर्यंत या गावांमधील नागरी सुविधांचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे ही गावे मुख्य प्रवाहापासून बाजूला पडत असल्याची तक्रारी वाढत असल्याने गुरुवारी या 44 गावांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली.
यावेळी या गावांमध्ये आजवर झालेली कामे आणि अद्याप कोणती कामे करणे आवश्यक आहेत याविषयी प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश आमदार मकरंद पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब भिलारे, यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, मधुसागरचे अध्यक्ष संजयबाबा गायकवाड, उपसभापती अंजना कदम, कोयना पुर्नवसन बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी चौरे, उपअभियंता कन्हेरे, गटविकास अधिकारी नारायण घोलप आदी मान्यवरांसह विविध खात्याचे काही प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
आ. मकरंद पाटील म्हणाले, कार्यकारी अभियंता यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेवून प्रत्येक गावात गेले पाहिजे, त्या-त्या गावात 18 नागरी सुविधांची कोणती कामे झाली आहेत व कोणती कामे करणे आवश्यक आहेत याची पाहणी करावी. गावातील सरपंचांना बरोबर घेवून त्यांच्या बरोबर चर्चा करून यापुढे गावात कोणती कामे प्राधान्याने करणे आवश्यक आहे याची यादी तयार करावी, तसेच ही यादी 15 जानेवारीपूर्वी सादर करावी.
15 जानेवारी रोजी पुन्हा एक बैठक घेण्यात येईल त्या बैठकीत कामांची यादी वाचण्यात येईल व त्यानंतर करावयाच्या कामांची अंतिम यादी तयार करण्यात येईल व त्यानंतर तातडीने विकास कामांचे अंदाज पत्रक तयार करण्यात येईल, जे ठेकेदार कामे वेळेत पूर्ण करीत नाहीत कामाचा दर्जा व्यवस्थित राखत नाही अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे अशा सुचनाही आ. मकरंद पाटील यांनी या बैठकीत दिल्या.
राजेंद्रशेठ राजपुरे म्हणाले, विकास कामांच्या अंदाज पत्रकात अनेक तृटी असतात, त्यामुळे विकासकामांना विलंब लागतो, काही ठेकेदार हे दिलेल्या मुदतीत कामे पुर्ण करीत नाहीत.
संजय गायकवाड म्हणाले, 44 गावे दुर्गम भागात असल्याने अंदाज पत्रक तयार करणारे अधिकारी हे गावात न जाताच अंदाज पत्रक तयार करतात. त्यामुळे मोठ्या अडचणी येतात, प्रत्यक्ष रस्ता दोन किमीचा असतो पण कार्यालयात बसून अंदाजपत्रक तयार केले गेल्याने ते अर्ध्या किंवा पाऊण किमीचे केले जाते.
शिवाय काही खात्यांकडे मनुष्यबळ कमी असल्याने त्याचाही फटका विकास कामांना बसतो. काही अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधींचेही काही ऐकत नाही. बैठकीस राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाबुराव सपकाळ, धोंडीबा सपकाळ, संजय उतेकर, संजय मोरे, डॉ. प्रमोद शेलार, सुभाष कदम, सुभाष कारंडे यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.