कोल्हापूर : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी असणाऱ्या ज्या शेतकऱ्यांनी अद्याप कोणत्याही वित्तीय संस्था व बँकांकडून पीक कर्ज घेतलेले नाही, अशा शेतकऱ्यांनी पीक कर्ज पुरवठा या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे अवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.
जिल्हयामध्ये 4 लाख 47 हजार 856 शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी असून, वेगवेगळया वित्तीय संस्था व बँकाकडून यापैकी 3 लाख 13 हजार 808 लाभार्थी शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. कोणत्याही वित्तीय संस्था तसेच बँकांकडून पीक कर्ज न घेतलेले 1 लाख 34 हजार 48 प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी शेतकरी जिल्ह्यामध्ये शिल्लक आहेत.
या शेतकऱ्यांना बँकींग क्षेत्राकडून पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यासाठी केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट ऑफ फायनान्शीयल सर्व्हीसेस तथा कृषी मंत्रालय यांचेकडून आदेश प्राप्त झाले आहेत.
या शेतकऱ्यांना अर्ज करता यावा यासाठी आयबीए संस्थेकडून एक पानी अर्जाचा नमुना सर्व बँकांना उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी या अर्जासोबत शेतीचे उतारे व कर्ज नसल्याबाबतचे घोषणापत्र घेऊन ज्या बँकेमधून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतला आहे तेथे संपर्क साधावा.
कोणत्याही बँक अथवा वित्तीय संस्था येथे पीक कर्ज नसणाऱ्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज प्रोसेसिंग चार्जेस व निरीक्षण खर्च बँकांकडून माफ करण्यात येणार आहे. परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना बँकामार्फत किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) योजनेंतर्गत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.
ही विशेष मोहीम दिनांक 25 फेब्रुवारी पर्यंत राबविण्यात येणार आहे. सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी गाव पातळीवर यासाठी विशेष मोहीम राबवून आपल्या कार्यक्षेत्रातील बँकांना सर्वतोपरी सहकार्य करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी दिल्या आल्या आहेत.