लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना होणार लाभ
पुणे – राज्यातील शेतमाल परराज्यातही मोठ्या प्रमाणावर जातो. मात्र, सध्या असणाऱ्या लॉकडाऊनमुळे हा माल जावू शकत नाही. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आता खास स्पेशल हॉर्टिकल्चर ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. या रेल्वेमधून शेतमाल परराज्यात पाठविणे सोपे जाणार आहे.
देशात आणि राज्यातील लॉकडाऊन आता तीन मेपर्यंत वाढला आहे. अशा परिस्थितीत हाताशी आलेल्या पिकाची विक्री झाली नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल त्यामुळे हा पर्याय निवडला आहे. देशातील उत्पादित होणारा 35 टक्के कांदा हा महाराष्ट्रात होतो. सध्या कांदा मोठ्या प्रमाणावर तयार आहे. त्याउलट उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये सध्या कांद्याची टंचाई जाणवत आहे. या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील कांदा हा परराज्यात योग्यवेळी गेला तरच त्याचा फायदा होणार आहे.
त्यामुळे आता स्पेशल हॉर्ट्रिकल्चर ट्रेनच्या माध्यमातून हा कांदा पंजाब, दिल्ली, बिहार तसेच दक्षिण व पूर्वोत्तर राज्यांमध्ये पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी पणन मंडळ आणि नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डच्यावतीने पुढाकार घेतला आहे.
या संदर्भात बोर्डाचे कार्यकारी संचालक श्रीनिवास बांडला म्हणाले, ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना परराज्यात कांदा विक्री करावयाचा असेल त्यांच्यासाठी 1,400 टन क्षमता असलेली 40 बोगीची स्वतंत्र रेक अथवा किमान 8 ते 9 बोगीसुद्धा वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या ट्रेनच्या नोंदणीसाठी इच्छुक शेतकरी, उत्पादक कंपन्या, व्यापारी यांनी मेलवर संपर्क साधावा किंवा 011-41222518 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
कोवीड-19 पार्सल स्पेशल ट्रेन
शेतमाल व अत्यावश्यक वस्तू वाहतुकीसाठी 58 रेल्वेमार्गांवर 109 पार्सल ट्रेनची सुविधा सुरू केली आहे. यातून राज्यातील शेतमाल व अत्यावश्यक वस्तू इतर राज्यांमध्ये पाठविणे सोईचे होणार आहे. लॉकडाऊनमुळे जो शेतीमाल इतरत्र पाठवू शकत नाही तो रेल्वे पार्सलमुळे भारतातील इतर शहरांमध्ये पाठविणे शक्य होणार आहे.