– श्रीनिवास श्री. हवालदार
चैत्र शु. प्रतिपदा या दिवशी आपण “गुढी पाडवा’ हा सण साजरा करतो. पण या सणाबद्दल आपणाला जास्त माहिती मिळाली तर, हा सण अधिक आत्मीयतेने व श्रद्धेने साजरा केल्याचा परमानंद लाभेल.
दरवर्षी सण-समारंभ येतात व जातात, पण अशा सणांमधून आपण काय बोध घेतला किंवा आपल्या आध्यात्मिक, वैचारिक, ज्ञानात किती भर पडली हे समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे वाटते. तसेच सण साजरे करताना सामाजिक दृष्टिकोन असणेही गरजेचे आहे.
पूर्वजांनी योग्य वेळ, काळ, स्थळ पाहून सुरू केलेले सण समारंभ आपणाला दिलेली एक अमूल्य देणगीच आहे. सामाजिक बांधिलकीचे नाते हे सणांमुळे अधिक बळकट होते. माणसातील सत्प्रवृत्ती, सदाचरण, सद्विचार, सत्कर्म, इ. गुणांची “गुढी’च उभारल्यासारखे आहे. ही गुढी वर्षानुवर्षे दिमाखात उभी ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. “परोपकार पुण्याय, पापाय, परपिडनम’ या उक्तीप्रमाणे दुसऱ्यांना पीडा, म्हणजेच जरी त्यांचे चांगले करता आले नाही, तरी वाईट करू नये. एखाद्याला दान देताना स्वार्थीपणापेक्षा परर्मार्थाने दान द्यावे.
“गुढी’ म्हणजेच विजयाची पताका. पूर्वीच्या काळी राजे, महाराजे युद्धात विजय मिळाला की, स्वत:चे प्रतिकात्मक चिन्ह असणाऱ्या पताका मिरवित होते आणि विजयोत्सव साजरा करायचे. कालमानपरत्वे या पताकांचे रूप बदलले, पण आजही काही ठिकाणी अशा प्रतिकात्मक पताका पाहण्यात येतात. सण साजरे करताना दिखाऊपणापेक्षा धार्मिकदृष्ट्या व परंपरागत पद्धतीने साजरे करून भावी पिढीला आदर्शवत असावे. म्हणजेच भावी पिढीतील युवक, युवती तेवढ्याच आत्मीयतेने व श्रद्धेने आपल्या परंपरेचे जतन करून सण समारंभ साजरे करतील. मनुष्य म्हटला की त्याचे जीवनात दु:ख, कष्ट, तणाव असणे स्वाभाविकच आहे. पण या गोष्टींचा विसर पडून सत्प्रवृत्ती व सन्मार्गाने जीवन जगण्याचे बळ सण समारंभातून मानवाला मिळते.
या भारतभूमीत अनेक संत, ऋषी, महात्मे होऊन गेले. त्यांचे आचार, विचार भिन्न असले तरी मानवता हा एकच धर्म आहे. असे महनीय स्वत:चे दुःख, कष्ट, यातना विसरून समाजाच्या कल्याणासाठीच या भूतलावर अवतार घेतात. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा नाश करून अयोध्येत प्रवेश केल्याप्रित्यर्थ विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विजयाच्या प्रित्यर्थ सर्वत्र पताका मिरविण्यात आल्या. या पताका म्हणजेच विजयाचे प्रतीक असणाऱ्या “गुढी’ उभारण्यात आल्या. “गुुढी’ म्हणजेच इंद्रध्वज उभारण्याची पद्धत आहे. ही गुढी दारासमोर उभी करावी. काही ठिकाणी जागे अभावी घराच्या गच्चीवर, खिडक्यांमध्ये गुढी उभारण्यात येते. ही गुढी उभारताना एका विशिष्ट प्रकारच्या कोनात, तिरक्या दिशेने उभारतात. सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवितात.
सूर्योदयाच्या वेळी योग्य मुहूर्तावर गुढी उभारण्याचा विधी धार्मिक पद्धतीने करावा. चैत्र मासात किंवा इंग्रजी कालदर्शिकेप्रमाणे मार्च अथवा एप्रिल महिन्यात गुढीपाडवा सण साजरा करतात. सूर्यसिद्धांत पंचांगाप्रमाणे हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. महाराष्ट्रात या सणाला “गुढी पाडवा असे म्हणतात, तर कोकणी बांधव यास “संन्वसर पाडवो’ असे संबोधतात. कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यात याला “उगादी’, बंगालमध्ये “पोईलो बैसाखी’, पंजाबमध्ये बैसाखी, व सिंधी बांधव “चेटीचंद’ या नावाने हा सण साजरा करतात.
वर्षातील याच कालावधीत सूर्याचे किरण अधिक प्रखर होतात व वातावरणातील उष्णता वाढते. पिकांची कापणी होऊन विक्रीसाठी बाजारात पाठवितात व फळेही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतात. वनस्पती व झाडे फुलांनी बहरलेली दिसतात व वातावरणात एक प्रकारचा उत्साह आणि नावीन्य जाणवते. “पाडवा’ हा शब्द संस्कृत शब्द “प्रार्दुर्भू’ पासून (पीक) उत्पत्ती झाल्याचे जाणकरांचे मत आहे. पाडवा म्हणजेच नूतन वर्षारंभ आणि शेतकरी बांधवांच्या दृष्टीने एक हंगाम संपून नवीन हंगामाच्या वर्षारंभाची सुरुवात मानतात. या दिवशी हिंदवी साम्राज्याचे अधिपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आठवणीनिमित्त पताका फडकावण्यात येतात. कर्नाटक व आंध्र प्रदेशात “उगादी’ च्या दिवशी होळगी (पुरणपोळी), आंब्याचे फोडीपासून बनवलेली “उगाडी पचेडी’ ज्यात कडुलिंबाची फुले व चिंच असते, बोब्बल्लू व भाताचा विशिष्ट प्रकार अशा प्रकारचे मिष्ठान्न बनवितात.
गुढी पाडव्याचे दिवशी शालिवाहन शतकातील सर्वजित् नाम संवत्सर संपून सर्वधारी नाम संवत्सर आरंभ होणार आहे. शालिवाहन हा सातवाहनांचा राजा होता ज्याची राजधानी गोदावरी नदीकाठी होती. विक्रमादित्य राजा म्हणजेच शौर्य व पराक्रमाचे प्रतीक मानले जाते. त्याने परकीय शक्तींचा पाडाव तर केलाच, त्याचप्रमाणे तो दरबारातील नवरत्नांचा आश्रयदाता होता. म्हणूनच विक्रमादित्याचे सिंहासन म्हणजेच योग्य न्याय मिळण्याचे आश्रयस्थान मानले जाते. तर कित्येक राजांनी त्यांचे नावाच्याआधी “विक्रमादित्य’ ही पदवी लावून या राजा बद्दलची आत्मियता व्यक्त केली आहे.
म्हणूनच हे दोन महायोद्धे म्हणजेच शालिवाहन आणि विक्रमादित्य यांचे कार्याचा योग्य सन्मानार्थ दोन्ही राजांचे नावाने “शक’ सुरू केले. (शालिवाहन शक, विक्रम शक) यावर्षी शा. श. 1930 सर्वधारीनासंवत्सर आरंभ होणार आहे. “गुढी’ पाडव्याच्या दिवसापुरतेच अनुसंधान न करता दुष्प्रवृत्ती, अनाचरण, दुष्टविचार, इत्यादीवर विजय मिळवून सन्मार्ग, सदाचरण, सत्प्रवृत्तीने जीवन जगून धर्माचरण केल्यास मानवाचे जीवन “सुजलाम् सुफलाम्’ होऊन आशेची नवी पालवी प्रफुल्लीत होईल.