मुंबई : राज्यात शासकीय नोकऱ्यांमध्ये सरळसेवेच्या कोट्यात ओबीसी, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाचा मिळून 15 हजार 426 पदांचा अनुशेष असून हा अनुशेष भरुन काढण्यासाठी विशेष भरती मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 14 आणि 22 फेब्रुवारी 2022 च्या पत्रान्वये सर्व प्रशासकीय विभागांकडून 31 डिसेंबर 2021 पर्यंतच्या अनुशेषाच्या पदांची माहिती मागविण्यात आलेली आहे, असे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत सांगितले.
राहुल कुल, जयकुमार गोरे, प्रकाश आबिटकर आदी सदस्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले की, विविध शासकीय विभागांसाठी एकूण 11 लाख 53 हजार 42 पदे मंजूर असून त्यातील 8 लाख 77 हजार 40 पदे भरलेली आहेत तर 2 लाख 3 हजार 303 पदे रिक्त आहेत.
राज्यात कोविड प्रादुर्भावाच्या दोन वर्षांच्या काळात पदांची भरती होऊ शकली नाही, मात्र आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठवून भरती प्रक्रियेला गती दिली आहे. गृह, आरोग्य आदी विभागांना देखील पद भरतीची परवानगी दिली असून भरती प्रक्रिया ताबडतोब राबवली जाणार आहे.
भरतीसाठी 15 हजार 390 पदांचे मागणीपत्र प्राप्त; 1 हजार 700 पदांसाठी लवकरच जाहिराती प्रसिद्ध होणार
शासकीय नोकऱ्यांमध्ये सरळसेवेच्या कोट्यातील भरती प्रक्रिया करण्यासाठी विविध विभागांकडून 15 हजार 390 पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले असून 7366 पदांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे. या सहा महिन्यात साधारणतः 6 हजार 200 पदांकरिता 300 जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून लवकरच एक हजार 700 पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करुन भरती प्रक्रिया राबविण्यात येईल असे सांगून गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उत्तम काम केले असल्याचेही राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले.