12व्या विश्वचषक स्पर्धेला थाटात सुरूवात झाल्यानंतर स्पर्धेतील पहिल्या दोन्ही लढतींमध्ये एकतर्फी निकाल लागल्याने उपस्थित प्रेक्षकांचा काही प्रमाणात हिरमोड झाला. त्यातील पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्याने स्थानिक प्रेक्षकांनी जल्लोश केला असला तरी पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघादरम्यानचा दुसरा सामना केवळ 35 षटकांचाच झाल्याने प्रेक्षकांमध्ये कमालीची नाराजी पसरलेली होती.
पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या संघासमोर विश्वचषक विजयाच्या दावेदारांपैकी एक असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे आव्हान होते. मात्र, इंग्लंडच्या गोलंदाजांनी आफ्रिकेचा डाव 40 व्या षटकातच संपवत स्पर्धेची सुरूवात थाटात केली. इंग्लंडचा संघ घरच्या मैदानावर खेळत असल्याने तेथील प्रेक्षकांनी संघाचा विजय डोक्यावर घेतला. मात्र, दुसरा सामना हा फार कमी काळ चालल्याने उपस्थित प्रेक्षकांचा बराच हिरमोड झालेला पाहायला मिळाला.
त्यातल्या त्यात सामन्याचे तिकिटे वाटपाच्या वेळी झालेल्या गडबडीमुळे सामना सुरू झाल्यानंतरही चाहत्यांना बराच वेळ तिकिटांच्या रांगेत घालवावा लागल्याने त्यांना अर्धा सामना मैदानाबाहेरील स्क्रिनवर पाहावा लागला. त्यातल्या त्यात सर्वात जास्त हिरमोड झाला तो पाकिस्तानी चाहत्यांचा. आधिच तिकिटांच्या रांगेत बराच वेळा गेला आणि मैदानात पोहोचल्या पोहोचल्या त्यांचा पूर्ण संघ तंबुत परतलेला त्यांना पाहावा लागला. त्यामुळे आल्या पावली परत फिरत त्यांनी सामन्याकडे दुर्लक्ष केले.
तसेच त्यांनी तिकिट खिडकीवर त्यांना झालेल्या त्रासाची अडचणही आयसीसीसमोर मांडली आणि आयसीसीनेही मोठ्या मनाने तिकिट असुनही मैदानात प्रवेश करायला उशिर लागलेल्या सर्व चाहत्यांना तिकिटीचे पैसे परत करण्याचे जाहिर केले. मात्र, जर या सामन्याचा निकाल एकतर्फी लागला नसता आणि सामना रोमांचक झाला असता तर आयसीसीलाही पैसे वापस करण्याची नामुश्की आली नसती. त्यामुळे चाहते आणि आयोजक दोघेही स्पर्धेत एकतर्फी सामने होवू नये यासाठी आशावादी असतील यात शंका नाही.