करोनाला आळा घालण्यासाठी पालिकेकडून नियोजन
614 रुग्ण फक्त पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत
पुणे – शहरात करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन सर्वाधिक रुग्ण असलेल्या पाच क्षेत्रीय कार्यालयांसाठी विशेष कृती आराखडा राबविण्यात येणार आहे. त्याचे नियोजन अंतिम टप्प्यात असून पुढील दोन दिवसांत या आराखड्याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे.
या पाचही क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात शहरातील एकूण रुग्ण संख्येच्या 72 टक्के करोनाधित रुग्ण आहेत. या क्षेत्रीत कार्यालयांमध्ये भवानी पेठ, कसबा-विश्रामबागवाडा, ढोले-पाटील रस्ता, घोले पाटील रस्ता आणि येरवडा-कळस-धानोरी या क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश आहे. शहरात 9 मार्चला करोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर शहरात 18 मार्चपासूनच गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना सुरू होत्या. त्यानंतर 23 मार्चपासून केंद्रशासनानेच लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे पूर्ण संचारबंदी असतानाही शहरातील रुग्णांचा आकडा 23 एप्रिलअखेर 881 वर पोहचला आहे.
त्यात 41 महापालिका हद्दीबाहेरील असून उर्वरीत 853 रुग्ण पुणे शहरातील आहेत. त्यात सर्वाधिक 614 रुग्ण या पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत आहेत. तर या ठिकाणचा रुग्णांचा आकडा वाढतच आहे. त्यामुळे ही रुग्णवाढ रोखण्यासाठी हा परिसर सील करून तसेच त्या ठिकाणी कडक कर्फ्यू लागू करूनही रुग्णांची संख्या वाढतच आहे. ही बाब लक्षात घेऊन या क्षेत्रीय कार्यालयांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
असा आहे विशेष कृती आराखडा
– संबंधित परिसरात महापालिकेची प्रत्येकी दोन मोबाइल पथके 24 तास तैनात करून त्या माध्यमातून रुग्ण सापडलेल्या परिसरातील सर्वांची तातडीनं वैद्यकीय तपासणी करून संशयितांचे विलगीकरण करणार .रुग्णवाहिकांची संख्या वाढविणार.
– प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी विशेष औषधे देणार
– विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर नियंत्रण आणणार
– रुग्णांच्या करोना चाचण्या वाढवणार
– नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी पालिकेच्या शाळांमध्ये हलविणार
– बहुतांश सार्वजनिक स्वच्छतागृहे असल्याने त्या ठिकाणीही संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन दिवसातून तीन ते चार वेळा त्या ठिकाणी स्वच्छता, औषध फवारणी करणार
शहरात पाच क्षेत्रीय कार्यालायांचा काही भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहे. त्या ठिकाणी विशेष कृती आराखडा राबवून रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्यात येणार आहे. हा आराखडा तयार असून पुढील दोन दिवसांत त्याची नियोजनात्मक अंमलबजावणी केली जाईल. रुग्ण संख्या वाढ रोखण्यासाठी सर्व विभाग एकत्र येऊन हा आराखडा राबवणार आहेत.
– रूबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, मनपा