नवी दिल्ली – बोगस कॉल सेंटरद्वारे लोकांची कशी फसवणूक केली जात आहे याकडे भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा सदस्य शिवप्रताप शुक्ल यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी केलेली टिप्पणीही सध्या सुरू असलेल्या गंभीर प्रकारांवर विचार करायला लावणारी आहे. मोबाइलमध्ये आज असे मेसेज येउन पडले आहेत की त्याकडे दुर्लक्ष केले व ते डिलीट नाही केले तर कशात तरी अडकण्याची भिती निर्माण झाली आहे.
बोगस डोमेनचा वापर करून लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार राजरोस सुरू आहेत. लोकांना मोबाइलवर फोन केला जातो. त्यांची माहिती जाणून घेतली जाते अन त्यांच्या खात्यातून लगोलग लाखो रूपये गायब केले जात आहेत. कोणी माहिती देत नसेल तर त्याचे खाते बंद करण्याची धमकी हे गुन्हेगार देतात. माणून घाबरून त्या लोकांना आपला ओटीपी सांगतो आणि कंगाल होउन बसतो.
अशा फसवणुकीच्या अनेक बातम्या आपल्या कानावर आल्या असून बऱ्याचदा तर क्रेडीट लिमीटपेक्षा जास्त रक्कमही गायब झाली असल्याचे दिसून आले असून हा अत्यंत चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की मोबाइलवर अनेक मेसेज येउन पडतात. यातील काही मेसेज तर असे असतात की ते तुम्ही डिलीट केले नाहीत, तर अडचणीत सापडण्याचीच शक्यता आहे.