भविष्यात पृथ्वीवर मनुष्यहानी होण्याचा वाढता धोका
वॉशिंग्टन : गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये जगातील सर्व देशांनी आपल्या अंतराळ मोहिमा वाढवल्याने अंतराळातील कचरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि आता या कचऱ्याचा पृथ्वीलाही धोका होऊ लागला आहे. आतापर्यंत ह्या कचऱ्याचा काही भाग पृथ्वीवर पडला तर फारसा धोका निर्माण होत नव्हता पण आगामी काळामध्ये हा कचरा जर पृथ्वीवर पडला तर त्याचे प्रमाण जास्त असल्याने मनुष्यहानी होण्याचा धोका वाढला आहे.
नेचर अस्ट्रोनॉमी नावाच्या मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखाप्रमाणे येत्या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये अंतराळातील या तांत्रिक कचऱ्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढणार असून हा कचरा जेव्हा वेगाने पृथ्वीवर पडेल तेव्हा मनुष्यहानी होण्याचा धोकाही वाढणार आहे. आज पृथ्वीच्यावर वातावरणामध्ये हजारो टन कचरा फिरत आहे. या व्यातिरिक्त उल्का आणि धूमकेतू यांच्यापासून निर्माण झालेला नैसर्गिक कचराही आहे.
उल्का किंवा धूमकेतूचे भाग जेव्हा पृथ्वीवर पडतात तेव्हाही काही प्रमाणात नुकसान होते, पण आजपर्यंत त्यामुळे प्राणहानी झाल्याचे वृत्त नाही पण मानवी अंतराळ मोहिमांमध्ये अवकाशात जो कचना निर्माण झाला आहे. तो मात्र भविष्यात मोठ्या प्रमाणावर प्राणघातक ठरू शकतो. एखाद्या अवकाश मोहिमेनंतर अवकाशामध्ये रॉकेट आणि इतर तांत्रिक भाग तरंगत असतात ते पृथ्वीच्या वातावरणात आल्यानंतर पृथ्वीच्या दिशेने वेगाने झेपावत असतात, ते पृथ्वीवर कोठे पडतील याबाबत कोणतेच नियंत्रण नसल्याने भविष्य काळामध्ये अशा प्रकारचे अपघात प्राणघातक ठरू शकतात.