फतेहाबाद, दि. 24 – उत्तर प्रदेशच्या फतेहपूर विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या उमेदवार आहेत 34 वर्षीय रुपाली दीक्षित. त्यांनी पदव्युत्तर शिक्षण इंग्लंडमध्ये पूर्ण केले असून भारततात परत येण्यापुर्वी दुबईत एका बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत होत्या. त्यांचे वडील आणि कुटुंबातील चार सदस्यांना एका खुनाच्या प्रकरणात जन्मठेप ठोठावल्यानंतर त्या आग्र्याला परतल्या.
घरातील सर्व जेष्ठ मंडळी कारागृहात असल्याने रुपाली यांनी हे प्रकरण हाताळण्यास सुरवात केली. कायद्याची भाषा अवगत होणे कठीण असल्याचे लक्षात येताच त्यांनी कायद्याच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्यात पदवीही मिळवली. त्यांनी त्यासोबत स्थानिक राजकारणात भाग घेत समाजकार्याला सुरवात केली.
फिरोझाबादमध्ये सुमन यादव या शिक्षकाच्या 2007 मध्ये केलेल्या खुनाच्या आरोपात रुपालीचे वडील अशोक दीक्षित यांना 2015 मध्ये न्यायालयाने दोषी ठरवले. खुनाच्या तीन गुन्ह्यासह एकूण 69 गुन्हे त्यांच्या नावावर आहेत. मुळचे फिरोझाबादचे असणारे हे कुटुंब आग्रा येथे स्थलांतरीत झाले असून तेथे ते शीतगृहाचा व्यवसाय करतात. अशोक यांना सुमन यादव हत्या प्रकरणात 2007 मध्ये अटक झाली तेंव्हापासून ते कारागृहात आहेत.
त्यांच्या वडिलांना अटक झाली त्यावेळी त्या 19 वर्षांच्या होत्या. त्यांचे धाकटे बंधू त्यावेळी 14 वर्षाचे होते. “मला या प्रकरणाबाबत सुरवातीला कोणीही काहीही सांगितले नाही. बाबा आमच्यासोबत रहात नाहीत याची वेगवेगळी कारणे सांगत असत. नंतर तर मला शिकायला परदेशात पाठवले, रुपाली सांगत होत्या.
आपली पदवी पुण्यातील सिंबायोसिस महाविद्यालयातून घेतल्यानंतर 2009 मध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी त्या इंग्लंडला गेल्या. तेथे त्यांनी कर्डीफ विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली. त्यांनी लीडस् विद्यापीठातून त्यांचे मार्केटींग अँड ऍडव्हराटाईजमेंट विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर दुबईत एका बहुराष्ट्रीय कंपनीत तीन वर्ष नोकरी केल्यानंतर त्या भारतात 2016 मध्ये परतल्या.
“माझ्या कुटुंबात काही तरी चुकीचे चालले आहे याची मला कल्पना होती. पण वस्तुस्थिती मला कोणी सांगत नव्हते. 2007 मध्ये पहिल्यांदा मला या प्रकरणाबात समजले. जुलै 2015 मध्ये माझे वडील आणि चार काकांसह 12 जणांना न्यायालयाने जन्मठेप सुनावली, असे रुपाली यांनी सांगितले.
“शिक्षा सुनावल्यावर वडिलांनी मला फोन केला. आपल्या कुटुंबाला तुझी गरज असल्याने तु घरी जा असे सांगितले. त्यावेळी दुबईत मी सिनियर एक्झीक्युटीव्ह म्हणून कार्यरत होते. मी तातडीने माझा राजीनामा दिला आणि मी भारतात परतले’, असे त्यांनी सांगितले.
घरी परतल्यावर मला दिसले की घरातील सर्वच पुरूष कारागृहात असल्याने या केसकडे पहायला कोणीच नव्हते. मलाही कायद्याचे शिक्षण नसल्याने अडचणी येत होत्या. त्यानंतर मी आग्रा विद्यापीठात मला कायद्याची माहिती होण्यासाठी प्रवेश घेतला.
अशोक सध्या बरेली मध्यवर्ती कारागृहात आहेत. तर त्यांचे भाऊ अजय दीक्षित (62) आग्रा कारागृहात आहेत. अन्य सर्व आरोपी जामीनावर बाहेर आहेत. हे प्रकरण न्यायालयात हाताळत असतानाच रुपालीने स्थानिक राजकारणात प्रवेश केला. 2017 च्या निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जितेंद्र वर्मा यांचा प्रचार केला. त्यात त्यांचा 34 हजार मतांनी विजय झाला. रुपाली यांनी सक्रीय प्रचार केल्याचे मान्य वर्मा यांनीही केले आहे.
दोन वर्षांनी रुपाली यांनी भाजपाच्या कार्यक्रमांना जाणे थांबवले आणि त्यांनी कर्म संघटन या संघटनेची स्थापना केली. समाजातील दुबळ्या वर्गासाठी त्यांनी समाज कार्य सुरू केले. करोना साथीच्या काळात गोरगरीबांना त्यांनी अन्नाची पाकीटे वाटून त्यांचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न केला.
दीक्षित यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक यांच्यावरील गुन्ह्याच्या प्रकरणात भाजपाने त्यांना कोणतीही मदत केली नाही. या ऊलट त्यांच्या अडचणीत वाढ केली. त्यामुळे त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. वडिलांची बाहुबली शक्ती आणि सामान्यांची ताकद याचबरोबर अमोघ वक्तृत्वाने भाजपासमोर मतदारसंघात मोठे आव्हान निर्माण केले आहे.