कृषी विभागाचे 5 लाख हेक्टर क्षेत्राचे होते नियोजन
नगर – दुष्काळी परिस्थितीचा प्रदीर्घ सामना केल्यानंतर जिल्ह्यात काही भागात जोरदार तर काही ठिकाणी जेमतेम पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात खरीपाची पेरणी ही 73 टक्के झाली आहे. कृषी विभागाने यंदा 4 लाख 78 हजार 638 हेक्टर क्षेत्राचे नियोजन खरीप हंगामासाठी केले होते. मात्र, आतापर्यंत 73 टक्के म्हणजे 3 लाख 49 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा पाऊस लांबल्याने मुगाच्या पेरण्याचा मोसम निघून गेला. जुन महिन्याच्या 22 तारखेपासून जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली होती.
गेल्यावर्षी जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने खरीपापाठोपाठ रब्बी हंगाम देखील वाया गेला होता. गेल्यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अतियश कमी पावसाची नोंद झाली होती. 63 टक्के पाऊस पडल्याने ऑक्टोबर महिन्यापासून जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली. त्यानंतर मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात पाणी व चारा टंचाई तोंड देत आहे. जुनच्या महिन्या आठवड्यानंतर परिस्थती बदलेल असे वाटले होते. पण हा महिना देखील कोरडा गेला. 22 जुन पासून पावसाला सुरूवात झाली. मात्र समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरणीची प्रमाण कमी झाले आहे. अकोले, संगमनेर तालुक्यासह नगर, शेवगाव, पाथर्डी, कर्जत व जामखेड या तालुक्यांमध्ये अल्पशा प्रमाणात तर काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली.
कृषी विभागाच्या अहवालानुसार यंदा समाधानकारक पाऊस झाल्यास जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होणे अपेक्षित आहे. त्यात 19 हजार हेक्टर क्षेत्रावर भात, दीड लाख हेक्टर क्षेत्रावर बाजरी, 1 हजार 900 हेक्टरवर नागली, 17 हजार 500 हेक्टरवर तूर, 35 हजार हेक्टर उडीद, सोयाबीन 85 हजार हेक्टर, भुईमूग 8 हजार हेक्टर, 55 हजार हेक्टर मका, नगदी उत्पन्न म्हणून पाहिले जाणाऱ्या कपाशीची 1 लाख 30 हजार हेक्टर असा एकूण साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाचा पेरणी उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे. खरीप हंगाम पेरणीसाठी 70 हजार क्विंटल विविध पिकांच्या बियाणांची मागणी कृषी विभागाने नोंदवली होती. यापैकी बाजरी, सोयाबीन, तूर, उडीद आदी विविध बियाणे प्राप्त करण्यात आले होते.