कात्रज – दक्षिण पुणे शहरातील पाण्याच्या प्रश्नाकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे अनेकांनी सांगितले असून, याबाबत महापालिका भेदभाव करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रश्नात जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने कटाक्षाने लक्ष घालून पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक ३८मध्ये नगरसेवक प्रकाश कदम यांच्या विकासनिधीतून करण्यात आलेल्या २० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. डॉ. ए पी जे अब्दुल कलाम क्रीडा संकुल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय महिला बचत गट हॉल व सुखसागरनगर पोलिस चौकी, कै. किसनराव उर्फ माऊली कदम उद्यान आणि महादेव नगर येथिल ७० लक्ष लिटर पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले.
पवार म्हणाले, शहराला पिण्यासाठी पाणी देत असताना ग्रामीण परिसरातील शेतकऱ्यांनाही पाणी देणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यांचाही विचार करावा लागतो. शहरी व ग्रामीण भाग यांच्यात भेदभाव न करता योग्य समन्वय साधणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरायला हवे. गैरवापर टाळायला हवा, असे त्यांनी सांगितले.
या चार कामांचे लोकार्पण झाल्याचे सांगत ही कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणांत प्रयत्न करणाऱ्या नगरसेवक प्रकाश कदम आणि प्रतिक कदम यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. याठिकाणी चांगले क्रीडा संकुल साकारण्यात आले आहे. येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील. तसेच कायदा व सुव्यवस्था चांगली ठेऊन त्याद्वारे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी सुखसागरनगर पोलिसचौकी नागरिकांसाठी मदत देणारे ठरेल. पोलिसांनी नागरिकांना चांगली वागणूक दिली गेली पाहिजे. चुकीच्या गोष्टीत मात्र, राजकीय हस्तक्षेप होत असेल तर कुणाचीही तमा न बाळगता कारवाई केलीच पाहिजे,असे पालकमंत्री अजित पवारांनी ठणकावून सांगितले.
चांगल्या प्रकारचे जीवन जगण्यासाठी आणि चांगला वेळ घालविण्यासाठी कै. किसनराव उर्फ माऊली कदम उद्यान सुख-दुःख वाटून घेणारे केंद्र बनेल. तसेच, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्यांना वाटते आता आपल्याला संधी मिळावी तर जुन्यांना वाटते आता शेवट आहे. आतातरी आपल्याला संधी मिळावी. मात्र, यातून सुवर्णमध्य साधत पक्षातर्फे मार्ग काढण्यात येईल, असा विश्वास पवारांनी कार्यकर्त्यांना यावेळी दिला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक नगरसेवक प्रकाश कदम यांनी केले. ते म्हणाले, या २० कोटींच्या कामांसोबत मोठ्या प्रमाणावर अन्य विकासकामेही करण्यात आली आहेत. केवळ प्रभाग क्रमांक ३८मध्ये आमदार चेतन तुपे यांच्या निधीतून २ कोटी रुपये निधी मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. प्रगती फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रतिक कदम यांनी मनोगत व्यक्त करताना, अजित पवार यांचे आभार मानत कात्रजच्या विकासासाठी पक्षाकडून कायम सहकार्य मिळत असल्याची भावना व्यक्त केली. आमदार चेतन तुपे यांनी या परिसरासाठी ४ कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचे सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक सुरेश कदम, माजी नगरसेविका भारती कदम, खडकवासला म. सं.अध्यक्ष काका चव्हाण नगरसेवक युवराज बेलदरे, नगरसेविका स्मिता कोंढरे, मगराज राठी, रवींद्र राठी, दीपक गुजर, सुधीर डावखर, निरंजन घाटे व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.