पर्ल – विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर प्रथमच लोकेश राहूलच्या नेतृत्वात मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील पहिल्याच सामन्यात दारूण पराभव झाला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
कर्णधार टेंबा बवुमा व रुसी वॅन दर दुसेन यांच्या शतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने निर्धारित ५० षटकांत ४ बाद २९६ धावा केल्या. प्रत्युत्तर फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला ५० षटकांत ८ बाद २६५ धावांपर्यंतच मजल मारता आली.
विजयासाठीच्या २९७ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. मात्र कर्णधार लोकेश राहुल १२ धावा करून बाद झाला. शिखर धवनने ७९ आणि विराट कोहलीने ५१ धावा केल्या. मात्र हे दोघं बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांना अपयश आलं. त्यामुळे भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं.
दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी निगडी, तबरेझ शम्सी आणि अँडिल फेलुक्वायो यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
बवुमाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, नवोदित सलामीवीर जेनेमन मलानने निराशा केली. दुसरा सलामीवीर क्वांटन डीकॉकही स्थिरावल्यावर 27 धावा काढून बाद झाला. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेची स्थिती 2 बाद 58 अशी होती. एडन मार्करमही चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. तेव्हा 3 बाद 68 अशी बिकचट स्थिती बनली होती. त्यानंतर मात्र, कर्णधार बवुमा व दुसेन यांनी डावाची सुत्रे आपल्या हाती घेत भारताच्या गोलंदाजीवर आक्रमण केले. या जोडीने आपापली अर्धशतके पूर्ण करत धावांची गतीही वाढवली. बवुमाने आपले शतकही थाटात पूर्ण केले. त्याने दुसेनच्या साथीत चौथ्या गड्यासाठी द्विशतकी भागीदारी केली व संघाचे द्विशतक फलकावर लावले. बवुमा शतकानंतर लगेचच बाद झाला.
दुसेन यानेही आपले शतक साकार केले. त्याने शतकानंतर आक्रमक फलंदाजीत वाढ केली. मात्र, त्याचवेळी भारताच्या गोलंदाजांनी अचुक गोलंदाजी केली व दक्षिण आफ्रिकेला त्रिशतकी धावांच्या आता रोखले. भारताकडून जसप्रीत बुमराहने 2 गडी बाद केले. रवीचंद्रन अश्विनने 1 गडी बाद केला.