लखनौ – अखेरच्या दोन चेंडूत सहा धावांची आवश्यकता असताना मध्यमगती गोलंदाज अरुंधती रेड्डी हिने नो-बॉल टाकला व त्याचा पुरेपूर लाभ घेत दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने दुसऱ्या टी-20 सामन्यांत भारतीय महिला संघावर अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. या विजयाच्या जोरावर तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
भारताने दिलेल्या 159 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या लिझेल ली व लॉरा वोल्वार्ट यांनी अर्धशतके फटकावताना धडाक्यात सुरूवात केली. लिझेलने 70 धावा तर, लॉराने नाबाद 53 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेचा हा भारतीय संघावरील पहिलाच टी-20 मालिका विजय ठरला आहे.
तत्पूर्वी, सलामीवीर शेफाली वर्मा व रिचा घोष यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 158 धावा केल्या. शेफालीने 6 चौकार व 2 षटकारांसह 47 धावांची खेळी केली. रिचाने 26 चेंडूंत 8 चौकारांसह नाबाद 44 धावांची खेळी करत भारताला दीडशतकी पल्ला गाठून दिला.
संक्षिप्त धावफलक –
भारतीय महिला संघ – 20 षटकांत 4 बाद 158 धावा. (शेफाली वर्मा 47, रिचा घोष 44, हरलिन देवल 31, अनेके बॉश 1-26) पराभूत वि. दक्षिण आफ्रिका महिला संघ – 20 षटकांत 4 बाद 159 धावा. (लिझेल ली 70, लॉरा वोल्वार्ट नाबाद 53, राजेश्वरी गायकवाड 1-20).