जोहान्सबर्ग – संततधार पावसाने व्यत्यय आणल्यानंतर सुरु झालेल्या खेळात सलामीवीर कर्णधार डीन एल्गरसह सर्व प्रमुख फलंदाजांनी केलेल्या जबाबदार फलंदाजीच्या जोरावर यजमान दक्षिण आफ्रिकेने भारताचा दुसऱ्या कसोटी सामन्यात 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 असी बरोबरी साधली.
पहिला सामना भारताने जिंकला होता. आता येत्या मंगळवारपासून केप टाऊनमध्ये सुरु होणारी तिसरी व अखेरची कसोटी या मालिकेचा विजेता ठरवणार आहे. या पराभवामुळे जोहान्सबर्गच्या वॉंडरर्स मैदानावरील भारताची अजिंक्य राहण्याची परंपराही मोडली गेली.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचे गोलंदाज प्रभावी कामगिरी करतील ही अपेक्षा संततधार पावसाने फोल ठरली. सामन्याची पहिली दोन्ही सत्रे पावसामुळे वाया गेली. पाऊस थांबला व दक्षिण आफ्रिकेने बुधवारच्या 2 बाद 118 धावांवरून आज खेळ सुरु झाल्यावर भारताच्या गोलंदाजांचे कोणतेही दडपण न घेता फलंदाजी केली. यात सर्वात आघाडीवर होता तो त्यांचा कर्णधार डीन एल्गर. त्याने धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली व संघाची सर्व सुत्रे एकहाती घेत विजयासह संघाला मालिकेतही बरोबरी साधून दिली. एडन मार्करम 31 व किगन पीटरसन 28 धावा काढून बुधवारी बाद झाल्यानंतर एल्गरनेच जबाबदारीने फलंदाजी केली. त्याने रुसी वॅन दर दुसेनला साथिला घेत दीडशतकी धावा फलकावर लावल्या.
दुसेन स्थिरावलेला असताना 40 धावांवर बाद झाला. मात्र, या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा टेंबा बवुमा याने एल्गरला सुरेख साथ दिली. एल्गरने आपल्या नाबाद 96 धावांच्या खेळीत 188 चेंडूंचा सामना करताना 10 चौकार फटकावले. बवुमाने नाबाद 23 धावांची खेळी केली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 68 धावांची अखंडीत भागीदारी केली. भारताकडून रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर व महंमद शमी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – भारत पहिला डाव – 202. दक्षिण आफ्रिका पहिला डाव – 229. भारत दुसरा डाव – 266. दक्षिण आफ्रिका दुसरा डाव – 67.4 षटकांत 3 बाद 243 धावा. (एडन मार्करम 31, किगन पीटरसन 28, रुसी वॅन दर दुसेन 40, डीन एल्गर नाबाद 96, टेंबा बवुमा नाबाद 23, रवीचंद्रन अश्विन 1-26, शार्दुल ठाकूर 1-47, महंमद शमी 1-55).