केपटाऊन – तीन दशकांपासून पाहिलेले स्वप्न अखेर आज पुन्हा भंग पावले. यामुळे भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका विजयापासून दूरच राहिला. तिसरा व निर्णायक कसोटी सामना 7 गडी राखून जिंकत दक्षिण आफ्रिकेने भारताचा तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 असा पराभव केला.
भारताने विजयासाठी दिलेले 212 धावा करण्याचे आव्हान दक्षिण आफ्रिकेने 3 गडी गमावून पूर्ण केले. भारताने कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने सलग दोन सामने जिंकले. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न अखेर भंग पावले.
पहिल्या डावात भारताने 223 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 210 धावांवर रोखत 13 धावांची आघाडी घेतली. मात्र, ऋषभ पंतचे शतक व कोहलीच्या 29 धावांचा अपवाद वगळता भारताकडून एकाही फलंदाजांनी सरस खेळ केला नाही व भारताचा दुसरा डाव 198 धावांवर संपला व दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य ठेवले गेले.
दुसरा डाव सुरू झाल्यावर सलामीवीर एडन मार्करम 16 तर, कर्णधार डीन एल्गर 30 धावांवर परतला. त्यानंतर शुक्रवारी खेळ सुरू झाल्यावर किगन पीटरसन आणि रुसी वॅन दर दुसेन यांनी तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली व संघाला दीडशतकी मजल मारून दिली. पीटरसन शतकाच्या जवळ आल्यावर 82 धावांवर शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर मात्र दुसेनने टेम्बा बवुमाच्या या जोडीने संघाचा विजय साकार केला.
दुसेनने नाबाद 41 आणि बवुमाने नाबाद 32 धावा केल्या. या जोडीने चौथ्या गड्यासाठी नाबाद 57 धावांची भागीदारी केली व संघाला या सामन्यासह मालिकाही जिंकून दिली. भारताकडून महंमद शमी, जसप्रीत बुमराह व शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक –
भारत पहिला डाव – 223. दक्षिण आफ्रिका पहिला डाव – 210. भारत दुसरा डाव – 198. दक्षिण आफ्रिका दुसरा डाव – 63.3 षटकांत 3 बाद 212 धावा. (किगन पीटरसन 82, डीन एल्गर 30, एडन मार्करम 16, रुसी वॅन दर दुसेन नाबाद 41, टेंबा बवुमा नाबाद 32, शार्दुल ठाकूर 1-22, महंमद शमी 1-41, जसप्रीत बुमराह 1-54).