कोलकता – भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यावर राजकारण प्रवेशासाठी दबाव असल्याचा दावा माकपचे ज्येष्ठ नेते अशोक भट्टाचार्य यांनी केला. पश्चिम बंगालचे माजी मंत्री असणारे भट्टाचार्य गांगुली कुटूंबीयांचे मित्रही आहेत. त्यामुळे त्यांच्या दाव्याने राजकीय वादंग होण्याची शक्यता आहे.
सौरव यांना शनिवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर त्यांना कोलकत्यातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रूग्णालयात त्यांची भेट घेतल्यानंतर भट्टाचार्य यांनी अनेकांच्या भुवया उंचावणारा दावा केला.
सौरव यांचा राजकीय वापर करण्यासाठी काही लोक प्रयत्नशील आहेत. त्यामुळे बहुधा सौरव यांच्यावर दबाव आला असावा. ते राजकीय व्यक्ती नाहीत. क्रिकेटमधील आयकॉन हीच त्यांची ओळख कायम रहावी. सौरव यांच्यावर राजकारणात प्रवेश करण्यासाठी दबाव टाकला जाऊ नये.
त्यांना राजकारणात सक्रिय न होण्याचा सल्ला मी काही दिवसांपूर्वीच दिला. त्यांनी माझ्या भूमिकेला विरोध दर्शवला नाही, असे भट्टाचार्य पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मात्र, कुणाकडून सौरव यांच्यावर दबाव टाकला जात आहे, याविषयी काही बोलण्याचे त्यांनी टाळले.
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक अवघ्या तीन-चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या तोंडावर सौरव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना काही काळापासून उधाण आले आहे. मात्र, स्वत: सौरव यांनी अजूनपर्यंत त्यांची भूमिका जाहीर केलेले नाही. दरम्यान, भट्टाचार्य यांच्या दाव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.
चुकीच्या मानसिकतेमुळे काही लोक सगळीकडे राजकारण पाहतात. सौरव यांच्या चाहत्यांप्रमाणेच आमचीही ते लवकर बरे व्हावेत अशी इच्छा आहे, असे ते म्हणाले. तर, सौरव यांना तृणमूल कॉंग्रेसमध्ये दाखल करण्याचे प्रयत्न आम्ही कधीच केले नाहीत. क्रीडा क्षेत्रातील आयकॉन म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो, असे तृणमूलने म्हटले.