नवी दिल्ली : : 1983 च्या ऐतिहासिक विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर, या पदासाठी रॉजर बिन्नी यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, यावरूनच आता तृणमूल काँग्रेसकडून भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
सौरव गांगुलीने भाजपात प्रवेश करण्यास नकार दिल्यानेच त्याला बीसीसीआय अध्यक्षपदावरून हटवण्यात आले असल्याचा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी केला आहे. याविषयी बोलताना घोष यांनी,“भाजपानं गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्यादरम्यान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली पक्षात प्रवेश करणार असल्याची अफवा उठवली होती. परंतु, सौरव गांगुलींनी राजकारणात प्रवेश करणार असल्यांच्या वृत्तांना फेटाळून लावलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव जय शाह ‘बीसीसीआय’च्या सचिवपदी सलग दुसऱ्यांदा कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र सौरव गांगुलीना पद नाकारण्यात आलंय, हे राजकीय सूडबुद्दीचं उदाहरण आहे, असा धक्कादायक आरोप कुणाल घोष यांनी यावेळी केला आहे.
मुंबईत 18 ऑक्टोबर रोजी बीसीसीआयची सर्वसाधारण सभा होणार असून त्यात बोर्डाच्या अध्यक्षपदाची घोषणा करण्यात येणार आहे. विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या पदावर कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सौरव गांगुलीला आयपीएल कमिशनरची जबाबदारी ऑफर करण्यात आली. मात्र, सौरव गांगुलीने या पदास नकार दिला. त्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचे धाकटे भाऊ अरुण सिंह धुमळ याच्याकडे आयपीएलच्या कमिशनरपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. ते ब्रिजेश पटेलच्या जागी कार्यभार संभाळतील.
तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार डॉ. शांतनू घोष यांनीही सौरव गांगुलीची दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. ” राजकीय सूडाचे आणखी एक उदाहरण. अमित शहा यांचा मुलगा पुन्हा सचिवपदी बसू शकतो, पण सौरव गांगुली नाही. ममता बॅनर्जी या राज्यातील असल्यामुळं की त्यांनी भाजपमध्ये प्रवेश न केल्यामुळे?” अशा शब्दात डॉ. शांतनू घोष यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले आहे.
तर दुसरीकडे तृणमूलकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना भाजपने फेटाळून लावले आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी याविषयी,”सौरव गांगुलीचा भाजपमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न कधी झाला? हे आम्हाला माहीत नाही. सौरव गांगुली हा क्रिकेट जगतातील एक दिग्गज आहे. पण काही लोक बीसीसीआयमध्ये होत असलेल्या बदलांवर मगरीचे अश्रू ढाळत आहेत.” सौरव गांगुली बीसीसीआय अध्यक्ष होण्याआधी कधी कोणतं पद भूषवलं होतं का? असाही सवाल दिलीप घोष यांच्याकडून उपस्थित करण्यात केला.