नागपूर आणि नगर भागातून संत्र्यांची आवक सुरू
लांबलेल्या पावसाचा फळाला बसलाय फटका
पुणे – फळ रंगाने आकर्षक असलेल्या आणि गोड चवीच्या नागपूर संत्र्याचा दुसरा हंगाम सुरू झाला आहे. तर, नगर येथील पहिला हंगाम सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात दोन्ही संत्र्याची आवक सुरू झाली आहे.
यंदा पावसामुळे संत्र्याचे उत्पादन सुमारे 50 टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 30 टक्क्यांनी भाव वाढले आहेत. सध्या बाजारात दर्जानुसार नागपूरच्या संत्र्याच्या 18 ते 20 किलोच्या एका पेटीस 300 ते 700 रूपये भाव मिळत आहे. तर नगरच्या गावरान संत्रीला तीन डझनच्या एक पाटीला 60 ते 200 रुपये भाव मिळत असल्याची माहिती अडते असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज काची यांनी दिली.
शहर उपनगरांसह गोवा, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, रायगड, रत्नागिरी, लोणावळा येथून संत्र्याला मोठी मागणी आहे. फळबाजारात नागपूर भागातून दररोज 8 ते 10 टन इतकी तर नगर भागातून 5 ते 6 टन इतकी संत्र्याची आवक होत आहे. नागपूर जल्ह्यातून अंजनगाव, अचलपूर, वरूड, चिखली, परतवाडा, अमरावती या भागातून संत्र्याची आवक होत आहे. तसेच नगर भागातील पिंपळी, उजनी, करंडी, पारनेर, काथुर्डी या भागातून गावरान संत्र्याची आवक होत आहे.
सध्या संत्र्याचा मृग बहार सुरू आहे. नागपूर आणि नगर येथील संत्र्याचा हंगाम जानेवारी ते मे अखेरपर्यंत असतो. यंदा संत्र्याचा हंगाम एक महिना उशिरा सुरू झाला आहे. सध्या बाजारात दाखल होत असलेली संत्री चवीला गोड असून त्याचा आकार आणि दर्जाही चांगला आहे, असे काची यांनी सांगितले.