– प्रा. पोपट नाईकनवरे
लोकसभा निवडणुकीतील शानदार विजयानंतर महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुका होत आहेत. महाराष्ट्रासाठी ही निवडणूक अनेकार्थांनी महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून होत असलेले पक्षांतर, युतीबाबतची अनिश्चितता, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची संदिग्धता, मनसेची भूमिका, कॉंग्रेसमधील उदासीनता आणि पडझडीने ढासळत चाललेला बुरुज सावरण्यासाठी राष्ट्रवादीच्या “जाणत्या राजा’ने घेतलेली आक्रमक भूमिका या सर्व पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळीत कुणाकडे फटाके फुटणार, याची उत्सुकता आहे.
लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचंड यश संपादन केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या डोळ्यांसमोर आता या तीनही राज्यांमधील विधानसभा निवडणुका जिंकण्याचे लक्ष्य आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी हरियाणासाठी “मिशन 75 प्लस’, झारखंडसाठी मिशन “65 प्लस’ आणि 288 जागा असणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेसाठी “मिशन 220′ प्लस असे महत्त्वकांक्षी उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे. भाजप आपला विजयरथ लोकसभा निवडणुकांनंतर तितकाच गतिमान राखणार का, याची कसोटी या निवडणुकांमधून लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने याच वर्षी मे महिन्यात लोकसभा निवडणुकीत शानदार विजय संपादन केला. त्या पार्श्वभूमीवर या विधानसभा निवडणुका होत असल्यामुळे भाजपचे मनोधैर्य उंच आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्ष लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत. दुसरी गोष्ट अशी, की विरोधी पक्षांची एकजूट अद्यापही होऊ शकलेली नाही. सोबतच विरोधकांच्या तुलनेत धनशक्ती आणि संचार कौशल्य तसेच संघटनकौशल्य भाजपकडे कितीतरी अधिक प्रमाणात असल्याने सध्या तरी विरोधकांपुढे आव्हान दिसत आहे.
भाजपने राष्ट्रीय अखंडता आणि देशाचे संरक्षण हे दोन विषय निवडणुकीचे मुख्य मुद्दे म्हणून पुढे आणले आहेत. कलम 370 आणि “ट्रिपल तलाक’ याबरोबरच चांद्रयान-2 हाही प्रचाराचा प्रमुख मुद्दा असणार आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष शेतकऱ्यांवरील संकट, वाढती बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेतील मंदी हे मुद्दे लावून धरतील. भाजपच्या दृष्टीने सकारात्मक बाब अशी की, काहीशी कमकुवत झालेली कॉंग्रेस महाराष्ट्र आणि हरियाणात भाजपची प्रमुख प्रतिस्पर्धी आहे तर झारखंडमध्ये कॉंग्रेसप्रणित आघाडीच भाजपसमोर असणार आहे. कमकुवत झालेला विरोधी पक्ष, राष्ट्रवाद विषयावर संग्रहित झालेले जनमत याबरोबरच शिवसेनेसोबत भक्कम युती या बाबी पुन्हा सत्तेत येण्यास भाजपला अनुकूल वाटत आहेत.
महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती 288 पैकी 229 जागा जिकेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मराठा आरक्षणाविषयी मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजप-शिवसेनेत येणाऱ्या नेत्यांची संख्या तसेच विरोधी पक्षांच्या मतांमध्ये होणाऱ्या विभाजनाच्या आधारावर हा दावा फडणवीस करतात. अन्य पक्षांमधून भाजपमध्ये येणाऱ्या सर्वांचे खुलेपणाने स्वागत केले जात आहे.
राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांमधून वरिष्ठ नेते भाजपकडे जात असल्यामुळे या दोन्ही पक्षांना मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. भाजप आणि शिवसेनेदरम्यान “कभी हॉं, कभी ना’ असे नाते नेहमीप्रमाणेच दिसत असून, त्याचीही परीक्षा या निवडणुकीत होईल.
2014मध्येही भाजपच सरस
– 2014 मध्ये हरियाणात भाजपने 90 पैकी 47, झारखंडमध्ये ऑल झारखंड स्टूडंट्स युनियनबरोबर आघाडी करून भाजपने
– 81 पैकी 42 जागा जिंकल्या होत्या, तर महाराष्ट्रात शिवसेनेसोबतच युती तोडून
– 288 पैकी 122 जागा जिंकल्या होत्या.
अशी राहिली आहे मतांची टक्केवारी
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या तीनही राज्यांतील एकंदर 72 जागांपैकी 63 जागा भाजपने जिंकल्या आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या मतांची टक्केवारी 28.1 टक्के होती, तर शिवसेनेचा मतांचा टक्का 19.5 होता. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला अनुक्रमे 18 आणि 17 टक्के मते मिळाली होती; तर अपक्षांना 4.8 टक्के आणि इतरांना 12 टक्के मते मिळाली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकांत भाजप आणि शिवसेनेला मिळालेल्या मतांची टक्केवारी 50 टक्क्यांहून अधिक आहे.