आळंदी – मार्चमध्ये झालेल्या होळीच्या सणानंतर सूर्यनारायणाने जी आग ओकण्यास सुरुवात केली आहे, ती आजतागायत. तापमानाचा पारा वाढतच राहिला आहे आणि राज्यातील करोडोंना त्याच्या झळा सोसाव्या लागत असल्याने जीव अगदी मेटाकुटीला आला आहे.सकाळी नऊ वाजल्यापासून सूर्य आग ओकत असल्याने व उन्हाच्या तीव्र झळा सोसवत नसल्याने रस्त्यावर एक चिटपाखरूही दिसत नसून, अनेक प्रकारची दैनंदिन व्यवहाराची कामे रखडत असल्याचे निदर्शनास येत आहे.
तब्बल दीड महिन्यापासून याचा सामना करीत असताना दैनंदिन व्यवहारात अनंत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आणखी एक ते दीड महिना या परिस्थितीला तोंड द्यावे लागणार असून, राज्यात ऐंशी टक्के भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. डोंगर-दऱ्यांत आणि आदिवासी भागात राहणाऱ्यांना तर पाण्यासाठी चार चार किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.
पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवडसारख्या मोठ्या प्रमाणात असलेल्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करणारी मोठमोठी जलाशयांनी देखील तळ गाठला असून, मे महिन्यातच येथील साठा संपण्याचे संकेत मिळत आहेत, तरी शहरवासीयांनी पाण्याच्या वापरात गांभीर्य ठेवून नियमित अत्यावश्यक तेवढेच पाणी वापरावे, अशी मागणी ज्ञा. ग. चौधरी यांनी केली आहे.