नगर (प्रतिनिधी) – शहरात अतिवृष्टी झाल्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना रस्त्यावरुन ये-जा करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. याबाबत आ.संग्राम जगताप यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन हे रस्ते तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.
आज या कामाला सुरुवात झाली. या कामाची आ.संग्राम जगताप यांनी पाहणी करुन विविध सूचना केल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, धनेश कोठारी, अफजल शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी आ. जगताप म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे रस्त्याची मोठी दुरावस्था झाली होती. याबाबत आपण प्रमुख रस्त्यांच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजगुरु, उपअभियंता गायकवाड यांच्यासमवेत औरंगाबाद-पुणे-मनमाड या प्रमुख महामार्गाची मध्यरात्री पाहणी करुन या संदर्भात तातडीने उपाययोजना करण्याबाबत सूचविले होते. त्या अनुषंगाने आज नगर शहरात प्रमुख रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्याच्या पॅचिंगच्या कामास सुरुवात झाली.
यावेळी रस्त्यालगतची स्वच्छता, डिव्हायडर दुरुस्ती, दिशादर्शक फलक, अपघात रोधक उपाययोजना, चौक सुशोभिकरण करण्यासंदर्भात समक्ष पाहणी करुन सदरील कामे येत्या आठ दिवसांत पूर्ण करण्याबाबत अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच नगर शहरातील बाजारपेठेतील अंतर्गत रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात येईल. नगर शहर खड्डेमुक्त करण्याचा आपला प्रयत्न असून, प्रमुख मार्गाबरोबर शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती सुरु आहे, त्यामुळे नगर शहर लवकरच खड्डेमुक्त होईल, असे सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यातील खड्डेमुळे नागरिकांना त्रास होत होता. तसेच सध्या सणासुदीचे दिवस असल्याने ही कामे तातडीने होणे गरजेचे होते. आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नाने रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.