नवी दिल्ली – मोदी सरकारच्या विरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. 15 ते 25 ऑक्टोबर दरम्यान कॉंग्रेस देशव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती कॉंग्रेसच्य अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिली आहे.
गुरुवारी दिल्लीमध्ये सोनिया गांधी यांची कॉंग्रेसचे सर्व नेते, महासचिव, प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आणि आमदारांसोबत पहिली महत्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये त्यांनी मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आरोप केले आहे. तसंच त्यांनी कॉंग्रेसचे सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना केंद्रसरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचे आदेश दिले आहेत.
या बैठकी दरम्यान सोनिया गांधी यांनी सांगितले की, जनतेने ज्या आशेने भाजपला पूर्ण बहुमत देऊन सत्तेत आणले. त्या तुलनेने त्यांच्याकडून काहीच कामं होत नाहीत. सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. त्यांना घाबरवले, धमकावले जात असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला. अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक आहे. मात्र, सत्ताधारी या मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत केंद्राच्या धोरणांविरोधात कॉंग्रेसने रस्त्यावर उतरुन निर्भयतेने लढायला तयार झाले पाहिजे, असे सोनिया गांधी यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्रातील सत्ताधारी भाजप जनादेशाचा गैरवापर करीत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. या सत्ताधारी भाजपविरोधात कॉंग्रेस पक्ष 15 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशभरात आंदोलन करणार आहे. यापूर्वी 20 ते 30 सप्टेंबर या कालावधीत सर्व राज्यांमध्ये या विषयावरील परिषदा घेण्यात येणार आहे.