नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. लॉकडाऊनवरून मोदी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी या परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या लोकांना सरकारने सर्वतोपरी मदत करावी, अशी विनंती पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
संपूर्ण देशभरात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर अनेक लोक रस्त्यात अडकून पडले आहेत. त्यांना घरापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी ही सरकारची असून त्यासाठी राज्य परिवहन सेवा पुरवण्यात यावी, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. याचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात यावे, असा उल्लेखही त्यांनी आपल्या पत्रामध्ये केला आहे.
Congress interim president Sonia Gandhi writes to Prime Minister Narendra Modi over the ‘impact of nationwide lockdown on the poor who are currently stranded in transit toward their homes’. #CoronaLockdown pic.twitter.com/Ij27j7ECxi
— ANI (@ANI) March 27, 2020
त्यांनी पत्रामध्ये म्हटले की, लाखोच्या संख्येने मजदूर रस्त्यावरच अडकले आहेत. लॉकडाऊनच्या परिस्थितीत वाहतूक सेवा बंद असल्यामुळे त्यांच्यावर अनेक मैलाचे अंतर पायी कापण्याची परिस्थिती ओढावली आहे. राष्ट्रीय स्तरावर योग्य तो निर्णय घेऊन रस्त्यात अडकलेल्यांना त्यांच्या घरी पोहचवण्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी विनंती सोनिया गांधी यांनी मोदींकडे केली आहे.
काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करत रस्त्यात अडकलेल्या नागरिकांची व्यथा मांडली आहे. दिल्लीच्या सीमा भागात अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या लॉकडाऊनमुळे त्रस्त आहेत. लोक पायी चालत आपल्या घराकडे जात आहेत. उपाशी पोटी त्यांची पायपीट सुरु आहे. सरकारने अडचणीत सापडलेल्या लोकांची मदत करावी, अशी विनंती प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.
देशातील लॉकडाऊनच्या परिस्थितीत दिल्लीत कामासाठी आलेली मंडळी गावाकडे जाण्यास निघाली आहेत. दिल्लीच्या सीमा भागातील लोक पायी घरच्या दिशेने निघाल्याचे चित्र पाहाला मिळत आहे. गर्दी टाळून कोरोनाचा सामना करण्यासाठी लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घेतला असताना सीमा भागात मजदूर लोकांचे थवेचे थवे पाहायला मिळत आहेत.