नवी दिल्ली – सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परिक्षेतील एका प्रश्नपत्रिकेत न ऐकणाऱ्या पत्नींच्या संबंधात वादग्रस्त परिच्छेद देण्यात आला होता. हा विषय आज थेट संसदेत उपस्थित झाला. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हा विषय उपस्थित करताना सरकारच्या महिलांच्या मनोवृत्तीवरच आसूड ओढले.
या प्रकरणी मोदी सरकारने माफी मागितली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. या उताऱ्यातील काही आक्षेपाचा भागही त्यांनी सभागृहात वाचून दाखवला. त्यानंतर काही वेळाने सीबीएसई बोर्डाच्या अध्यक्षांनी या प्रश्न पत्रिकेतील सदरचा परिच्छेद रद्द करण्यात आल्याचे घोषित केले आणि त्या प्रश्नाचे सर्व गुण विद्यार्थ्यांना दिले जातील असे त्यांनी जाहीर केले.
या परिच्छेदात महिलांनी पतीच्या आदेशाचे सक्तीने पालन करावे, महिला आधिक स्वतंत्रपणे वागू लागल्या तर सामाजिक आणि कौटुंबिक समस्या निर्माण होतात. महिलांनी आपल्या पतीचे ऐकणे सोडून दिले तर घरातील मुले आणि नोकरही बिघडतात असले तपशील या उताऱ्यात होते.
या पद्धतीच्या शिकवणुकीचा मुलांवर विपरित परिणाम होत असून यातून सरकारला नेमके काय साधायचे आहे असे प्रश्न उपस्थित करीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, द्रमुक या पक्षाच्या सदस्यांनी सभागृहातून सभात्याग केला.
तत्पुर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून या प्रकरणी सरकारवर टीका केली. टिपीकल संघ व भाजपच्या मनोवृत्तीचेच दर्शन या प्रश्नाच्या उताऱ्यातून दिसून आले आहे. भारताच्या युवा पिढीचे भवितव्य आणि त्यांच्यातील नैतिकताच नाहीशी करण्याच्या प्रयत्नाचाच हा भाग आहे असेही त्यांनी म्हटले होते.