नवी दिल्ली – देश आज स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवरही निशाणा साधला.
महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंसारख्या नेत्यांची बदनामी करण्यासाठी केंद्र ऐतिहासिक तथ्यांचे चुकीचे वर्णन करत असल्याचा आरोप करत सोनिया गांधी यांनी केंद्रावर टीका केली. त्या पुढे म्हणाल्या की,’केंद्र सरकार आपला राजकीय प्रचार करण्यासाठी महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे.’
‘गांधी-नेहरू-आझाद-पटेल यांसारख्या नेत्यांची प्रतिमा मलीन करत आहे मोदी सरकार’
स्वातंत्र्य लढ्यात भारतीय सैन्याने दिलेल्या बलिदानाला केंद्र सरकार कमी लेखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला. “भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ऐतिहासिक तथ्ये खोटे ठरवण्याच्या आणि गांधी-नेहरू-आझाद-पटेल यांसारख्या नेत्यांची बदनामी करण्याच्या या संकोचवादी सरकारच्या प्रत्येक प्रयत्नाला विरोध करेल,” असेही त्या म्हणाल्या.
भारताच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला शुभेच्छा देताना सोनिया गांधी म्हणाल्या, “गेल्या 75 वर्षांमध्ये, अत्यंत प्रतिभावान भारतीयांनी देशाला विज्ञान, शिक्षण, आरोग्य आणि माहितीच्या क्षेत्रात प्रगतीच्या मार्गावर नेले आहे. भारताच्या दूरदर्शी नेत्यांनी मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रणालीचा पाया घातला. सशक्त लोकशाही आणि घटनात्मक संस्थांसाठीही त्यांनी तरतूद केली. वैविध्यपूर्ण संस्कृती आणि भाषांद्वारे भारताने एक अभिमानास्पद राष्ट्र म्हणून आपली प्रतिमा मजबूत केली आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.’