नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि बसपच्या प्रमुख मायावती यांना भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात यावे, अशी मागणी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीष रावत यांनी केली आहे. राजकीय नेता म्हणून नव्हे; तर देशाचा नागरिक म्हणून ती मागणी करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असणाऱ्या रावत यांनी ट्विटरवरून केलेल्या मागणीनंतर पीटीआय वृत्तसंस्थेने त्यांची भूमिका जाणून घेतली. सोनियांनी ज्याप्रकारे भारतीय संस्कृती आणि स्त्रीत्वाचा स्वीकार केला; तो खरोखरीच वाखाणण्याजोगा आहे. त्यांनी कौटूंबिक मुल्ये आणि सामाजिक कर्तव्यांचे पालन केले. त्यामुळे भारतीय महिलांच्या प्रतिष्ठेने नवी उंची गाठली.
केंद्रात कॉंग्रेसची सत्ता असतानाच्या काळात सोनियांनी देशातील जनतेला विविध अधिकार प्रदान करण्यासाठी कार्य केले. मोठा संघर्ष करून मायावती उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचल्या. त्यांच्यामुळे दलितांना प्रेरणा मिळाली.
तसेच, शोषितांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला, असे प्रशंसोद्गार रावत यांनी काढले.