नवी दिल्ली – मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. त्यामुळे राज्यातील आणि राष्ट्रीय राजकारण तापले आहे. भाजप नेते यावर सावध भूमिका घेत असून यावर बोलणे टाळत आहे. तर विरोधी पक्ष यावरून आक्रमक झाले आहेत. राज्यात अर्णब गोस्वामी यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे. आता काँग्रेसच्या हंगाम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील अर्णब गोस्वामीच्या चॅटवरून घणाघाती टीका केली आहे.
इतरांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे सर्टिफिकेट वाटणाऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे, अशा शब्दांत सोनिया गांधी यांनी अर्णव यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेस कार्य समितीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. यावेळी त्यांनी अर्णव गोस्वामी यांचं नाव न घेता टीकास्त्र सोडले.
गेल्या काही दिवसात आपण राष्ट्रीय सुरक्षेशी कशा पद्धतीने खेळल्या जातयं हे पाहिलं. जे लोक दुसऱ्यांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे प्रमाणपत्रं देत होते, त्यांचाच पूर्णपणे पर्दाफाश झाला आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा अत्यंत गंभीर विषय असताना याविषय़ी गोपनीय माहिती समोर आली आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून केंद्र सरकारने मात्र त्यावर मौन बाळगलं असल्याचा घणाघात सोनिया गांधी यांनी केला.
यावेळी त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. सरकारला खासगीकरण करण्याची प्रचंड घाई झाल्याचे दिसून येत असल्याचे त्या म्हणाल्या.