भाष्य : अभय छाजेड (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी)
सोनिया गांधी कॉंग्रेस भवनात मेळाव्यासाठी ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळेत आल्या. त्यांच्या बरोबर मुख्यमंत्री विलासराव देशमुख, खासदार सुरेश कलमाडी वगैरे नेते मंडळी होती. कार्यक्रमाचा संयोजक मी असल्याने भाषणाची संधी मला नव्हतीच. सर्वांची भाषणे झाली. सोनियाजींच्या भाषणानंतर मी आभार प्रदर्शनासाठी पोडियमजवळ गेलो. त्याचवेळी नेते मंडळी उठून जाऊ लागली होती. मला पोडियमजवळ गेलेला बघून जाण्यासाठी निघालेल्या सोनियाजी पुन्हा खुर्चीत बसल्या. त्यामुळे सर्वच नेत्यांना पुन्हा स्थानापन्न व्हावे लागले.
कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, यूपीएच्या चेअरमन असूनही त्यांनी सभाशास्त्राचे नियम, संकेतांचे पालन स्वतः करताना अन्य नेत्यांनाही करायला भाग पाडले. नेते मंडळींची निघण्याची गडबड बघून मी एका वाक्यात आभार प्रदर्शन करणार होतो, पण सर्वजण बसलेले बघून जरा निवांतपणे आभार मानले.
“एक नई सुबह’ या कार्यक्रमाचा संयोजक म्हणून मी सरहद्द संस्थेचे संजय नहार यांच्या बरोबर काश्मीर खोऱ्यातील 350 मुलामुलींना पुण्यात आणले होते. सर्व मुले काश्मीर बाहेरचे जग प्रथमच अनुभवत होते. त्या मुलांना पुणे, मुंबई, नागपूर अशा काही शहरांना भेटी देऊन शेवटी दिल्लीत दाखल झालो. त्यावेळी केंद्रात एनडीएचे सरकार अन् वाजपेयी पंतप्रधान होते.
दिल्लीतील अनेक नेत्यांच्या भेटी या मुलांनी घेतल्या. लालकृष्ण अडवाणी यांनी स्वतःहून मुलांची भेट घेतली हे विशेष. शेवटी सोनिया गांधी यांची भेट ठरली होती. त्यासाठी त्यांनी पाच मिनिटे दिली होती. आम्ही मुलांना घेऊन त्यांच्या घरी गेलो. त्यांनी आस्थेने सर्व मुलांची चौकशी केली. त्यानंतर त्या मुलांशी गप्पा मारत होत्या. सर्वात शेवटी मुलांनी त्यांना सांगितले की, आम्ही काश्मिरी गाणं म्हणणार आहोत तुम्हीही सामील व्हा. सोनियाजींनी काहीही आढेवेढे न घेता गाण्याच्या ठेक्यावर मुलांबरोबर फेर धरला. पाच मिनिटांसाठी ठरलेली भेट ही तासांची भेट झाली. काश्मिरी मुलांबरोबर सोनियाजींनी फेर धरलेला तो फोटो देशभरातील सर्व वृत्तपत्रांत दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध झाला. त्यामुळे मी, संजय नहार यांचेही चेहरे देशभरातील सर्व वृत्तपत्रांत झळकले. अशी प्रसिद्धी क्वचितच मिळत असल्याने हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही.
राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी राजकारणात येण्यास तयार नव्हत्या. कॉंग्रेस पक्षाची गरज ओळखून त्यांनी 1998 साली कॉंग्रेसची जबाबदारी स्वीकारली. जिकिरीने, चिकाटीने देशभर दौरे करत त्यांनी पक्षसंघटना बळकट करून 2004 साली निवडणुकांत कॉंग्रेसला यश मिळवून दिले. कुणालाही स्पष्ट बहुमत नसतानाही 28 पक्षांची एकत्रित मोट बांधून कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याची किमया त्यांनी साध्य करून दाखवली. माहिती अधिकार कायदा, अन्न सुरक्षा कायदा असे चांगले कायदे त्यांनी सरकारला करायला लावले.
“मनरेगा’सारखी योजना देशभर लागू करून गरिबांना आधार दिला. यातून त्यांनी डॉ. मनमोहनसिंग यांना पंतप्रधान करताना उदारमतवादी उजव्या बाजूची विचारसरणी स्वीकारतच समाजातील सर्वांना सहभागी करून घेणारी सर्वसमावेशक अर्थव्यवस्था निर्माण केली.
पारदर्शकता आणि गोरगरिबांपासून सर्व थरातील व्यक्तींचे म्हणजेच सर्वसामान्यांचे हित साधत सर्वसमावेशकतेचा आग्रह सोनियाजींनी कधी कायद्याद्वारे तर कधी कृतीतून धरला आणि सर्वांना पूर्ण करायला लावला. अशा नेत्या सोनियाजी गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्यांना चांगले आरोग्य लाभो ही प्रार्थना!