नवी दिल्ली : पंजाबच्या राजकारणात काल मोठी खळबळ माजली. पक्षश्रेष्ठींना आपल्या कार्यक्षमतेबद्दल शंका असल्याने आपल्याला अपमानित वाटत असल्याचे कारण देत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी फोन करुन आपल्याला ‘सॉरी’ म्हटल्याचा दावा केला आहे. दरम्यान, त्यांच्या या दाव्यावर पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी, “सोनिया गांधी यांनी मला सकाळी फोन केला पण मी तो उचलू शकलो नाही. त्यानंतर मी त्यांना पुन्हा फोन केला आणि हे सगळं काय चाललंय याबद्दल विचारणा केली आणि अशा परिस्थितीत मी राजीनामा देणं योग्य आहे, असे त्यांनी सांगितले. त्यावर त्या म्हणाल्या की ठीक आहे, द्या तुम्ही राजीनामा आणि त्यानंतर त्या म्हणाल्या सॉरी अमरिंदर” असे म्हटले असल्याचा दावा केला आहे.
अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागेवर मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत अनेक नावांची चर्चा होताना दिसत आहे. मात्र राहुल गांधी यांचे आप्त, माजी खासदार आणि पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय पंजाब सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री होणार असल्याचेही सांगितले जात आहे. या पदासाठी चरणजीत सिंग चन्नी, राजकुमार वेरका तसंच सुखजिंदर सिंग रंधावा यांची नावे समोर येत आहेत. दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एक दलित समुदायातील असेल अशीही माहिती मिळत आहे.