मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांच्या ‘पठाण’ चित्रपटामधील ‘बेशरम रंग’ गाण्यामध्ये दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीमुळे मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता. त्यावर अनेकांनी आपापली मते नोंदवली होती. आता यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे.
‘आज में मूड बना लिया’ हे अमृता फडणवीस यांचे नवे गाणे काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आले. या निमित्ताने त्यांनी एका रेडिओ चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी गाण्यावरुन होणाऱ्या वादविवादावर भाष्य केले. “कोणतेही गाणं करतेवेळी संस्कृतीची काळजी घ्यायला हवी. तसंच मला वाटतं की गाण्याला कोणत्याही धर्माची भाषाची नसते. ते वेगळं असतं. आपण गाण्याला गाण्याच्या पद्धतीनेच पाहायला हवं. यामुळे होणारे वादविवाद टाळता येतात. हे केल्याने विनाकारण होणारे वाद होणार नाहीत.
“गाणे, कला, संस्कृती या गोष्टी वेगळ्या आहेत त्याकडे आपण तटस्थ पद्धतीने पाहायला हवं. तसेच जे निर्मिती करत आहेत, त्यांनी यातून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही, याबद्दल काळजी घ्यायला हवी. याबद्दल दोन्हीही बाजूने समतोल राखला गेला पाहिजे”, असे अमृता फडणवीसांनी म्हटले.
दरम्यान अमृता फडणवीस यांची काही गाणी याआधीही प्रदर्शित झाली आहेत. त्यांच्या या गाण्यांना सोशल मीडियावरही बराच प्रतिसाद मिळाला. शिवाय त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. ‘वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’ या त्यांच्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.