नवी दिल्ली – उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वीच मागास वर्गातील नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे अडचणी आलेल्या भाजपसमोर आता तिकीट वाटपाची समस्या निर्माण झाली आहे. त्यातच नेत्यांच्या मुलांसाठी तिकीटीची मागणी करण्यात येत आहे. मात्र भाजपने एका कुटुंबात एकाच व्यक्तीला तिकीट देण्याचा नियम केल्यामुळे अनेक नेत्यांची अडचणी झाली आहे. त्यामुळे पक्षात अंतर्गत कलह निर्माण होण्याची शक्यता आहे.
भाजप खासदार रिटी बहुगुणा जोशी यांच्या मागणीमुळे भाजपसमोर पेच निर्माण झाला आहे. जोशी यांनी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून मुलाला तिकीट देण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं की, माझा मुलगा मयंक मागील अनेक दिवसांपासून सक्रिय आहे. तो मेहनत घेतोय. त्याला विधानसभेचं तिकीट मिळायला हवं. पक्षाने मयंकला तिकीट दिल्यास आपण नियमांचं पालन करण्यास तयार असून आपण खासदारकीचा राजीनामा देऊ शकतो, असं जोशी यांनी म्हटलं.
दरम्यान आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं जोशी यांनी स्पष्ट केलं. मी भाजपमध्ये होते, आहे आणि राहणार. मात्र एका कुटुंबात एकच तिकीट यामुळे आपण खासदारकीचा राजीनामा देऊ जेणेकरून आपल्या मुलाला तिकीट मिळेल.
बऱ्याच वर्षांपूर्वी काँग्रेससोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या जोशी यांनी मुलाला तिकीट मिळाव यासाठी प्रयत्न करत असल्याचं मान्य केलं. मात्र त्यासाठी आपण लॉबिंग करत नसल्याचं त्यांनी म्हटलं.