जेजुरी -करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जेजुरी शहर व परिसर कंटेन्मेंट म्हणून घोषित करण्यात आला असून 14 दिवस पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाचा सोमवारी (दि. 20) होणारा सोमवती यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे. तसेच परंपरेनुसार कऱ्हास्नानासाठी गडकोट आवारातून प्रस्थान होणारा पालखी सोहळासुद्धा रद्द करण्यात आला आहे.
मात्र नित्य सेवेकरी,पुजारी, मानकरी यांचे हस्ते सोमवती उत्सवाचे श्रींचे सर्व धार्मिक विधी होणार आहेत. ही संख्या सुद्धा अत्यंत मर्यादित राहणार असल्याचे प्रमुख वतनदार इनामदार पेशवे यांनी जाहीर केले. लॉकडाऊनच्या काळात सोमवती यात्रेनिमित्त खंडेरायाच्या धार्मिक विधीं व नियोजनाबाबत ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, सेवेकरी, देवसंस्थान विश्वरस्त, पुजारी वर्गाची सोमवारी (दि. 13) प्रमुख वतनदार पेशवे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली.
यावेळी प्रमुख वतनदार इनामदार राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, सचिव छबन कुदळे, जालिंदर खोमणे, रामदास माळवदकर, संजय खोमणे, कृष्णा कुदळे, आबा राऊत, अमोल शिंदे, दिलावर मनेर, नंदू मोरे, काशिनाथ मोरे, अविनाश सातभाई, कुंडलिक दावलकर, माजी विश्वस्त सुधीर गोडसे, देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप, विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडेपाटील, जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अंकुश माने आदी ग्रामस्थ मानकरी उपस्थित होते.
सोमवारी (दि. 20) श्रींच्या उत्सवमूर्ती सजविण्यात आलेल्या चार चाकी वाहनातून कऱ्हा नदीतीरावर प्रस्थान करणार आहेत. नदी तिरावर सुरक्षित अंतर ठेवून नित्य सेवेकरी, मानकरी, पुजारी यांच्या हस्ते “श्रीं’च्या उत्सव मूर्तींना अभिषेक, स्नान घालण्यात येऊन पुन्हा वाहनातून जेजुरीत येत गडकोट आवारात दाखल होणार आहेत. यावेळी नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे.
भाविकांवर कारवाई
भाविकांना देवदर्शन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवती यात्रेनिमित्त कोणीही भाविकांनी शहरात येऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी सांगितले.