शिवसेना नेता संजय राऊत यांचा पुन्हा भाजपला टोला
मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेसाठीच्या नाट्यमय घडामोडी अजूनही कायम आहेत. राज्यात निवडणुका निकालानंतर मुख्यमंत्रिपदासाठी भाजप आणि शिवेसना यांच्यातील युती तुडली. यानंतर शिवेसना आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान संजय राऊत दररोज एक सूचक ट्विट करत भाजपवर निशाणा साधताना दिसत आहेत. आजही त्यांनी असेच एक ट्विट करत भाजपला टोला लगावला आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 22, 2019
संजय राऊत ट्विट करत म्हणाले की, ‘कभी कभी कुछ रिश्तोंसे बाहर आ जानाही अच्छा होता है…अहंकार के लिए नहीं, स्वाभिमान के लिए’ असे ट्विट करत राऊतांनी एकप्रकारे भाजपला टोला लगावला आहे. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर शिवसेनेने सत्तेत समसमान वाटा हवा ही मागणी लावून धरली. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्यात येईल हा फॉर्म्यूला ठरल्याचा दावा शिवसेनेने केला. तर असे काही ठरलेच नव्हते असे भाजपने म्हटले. यानंतर भाजप शिवसेनेमधील वाद विकोपाला गेला आणि त्यांची युती तुटली. आम्ही अहंकारासाठी नाही तर स्वाभिमानासाठी युती तोडली असे या ट्विट मधून संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे.
आता शिवसेना कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे. आज सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुंबईत दाखल झाले आहेत. त्यानंतर रात्री उशिरा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर सकाळी बोलणारा, एवढीच प्रतिक्रिया देऊन ते बाहेर पडले. यामुळे आज सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच गुरुवारी संजय राऊतांनीही शुक्रवारी सर्व काही स्पष्ट होईल असे संकेत दिले होते.