मुंबई : राज्यासह संपूर्ण देशात काल उत्साहात धुळवड साजरी करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर भारतीयांबरोबर धुळवड साजरी केली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षावर खोचक शब्दात टोलेबाजी केली. मागच्या काळात कुणीतरी आमच्या मित्रांना खोटं सांगून भांग पाजली होती, अशा आशयाचे विधान देवेंद्र फडणवीसांनी केले. त्यांचे हे वाक्य सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी होळीच्या पार्श्वभूमीवर बोलताना, “आम्ही विधानसभेत उभं राहून म्हटलं होतं की, खूप लोकांनी आम्हाला त्रास दिला आहे. त्या सर्व लोकांचा आम्ही बदला घेऊ. आम्ही त्या सर्व लोकांना माफ केलं आहे, हाच आमचा बदला आहे. आम्ही आधीच माफ केलं आहे. आमच्या मनात काहीही कटुता नाही.” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मात्र विरोधी पक्षावर खोचक शब्दात टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी,“आमचे काही मित्र आहेत. त्यांना मागच्या काळात कुणीतरी खोटं सांगून भांग पाजली होती. त्यानंतर काही दिवस त्यांचं जे काही चालंल होतं, ते पाहून मजा आली. कुणी गाणं म्हणत होतं, कुणी रडत होतं. पण मी हे सांगण्याचा प्रयत्न केला की, अशी नशा करण्यापेक्षा भक्तीचा, संगीताचा किंवा कामाचा नशा करावा.”असा टोला लगावला.
“मला फक्त एक-दोन लोकांना सल्ला द्यायचा आहे. उत्तर भारतात होळीच्या दिवशी शिमगा साजरा करण्याची पद्धत आहे. आपल्याकडेही शिमगा साजरा केला जातो. पण आपल्याकडे काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात. त्यांना मला एवढंच सांगायचंय की, एखाद्या दिवशी शिमगा ठीक आहे. पण उरलेले ३६४ दिवस सभ्य माणसासारखं वागण्याचा प्रयत्न केला, तर उत्तम होईल,” अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी कुणाचेही नाव न घेता टोलेबाजी केली.