वीकेंड लॉकडाऊनवेळी निर्दशानातून पोलीस यंत्रणेची प्रतिक्रिया
सहकारनगर – करोना बाधित रुग्णसंख्या वाढत असताना प्रशासनाकडून निर्बंध लादले जात आहे. परंतु, उच्चशिक्षित नागरिकच पळवाट काढून घराबाहेर पडत असल्याचे वीकेंड लॉकडाऊन मधील नोंदी तसेच गुढीपाडव्या निमित्त बाहेर पडलेल्या गर्दीवरून निदर्शनास आले आहे. जे लोक नियम पाळत आहेत त्यांच्या जीवाला अशा लोकांकडून धोका संभवत असल्याने असे लोक पोलिसांसाठीही डोकेदुखी ठरत आहेत. जे लोक अशिक्षित आहेत त्यांना सांगितले की ते गप्प बसतात. परंतु, उच्चशिक्षीत लोकांना सांगायला गेले की ते कायदे शिकवतात. वाद घालतात त्यामुळे आडाणी लोक परवडले, असे पोलीस सांगत आहेत.
करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. संसर्गजन्य आजार असल्याने यावर सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव उपाय असल्याने वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नियम पाळण्याचे आवाहन प्रशासन तसेच पोलीस यंत्रणा करीत आहेत. परंतु, भाजीपाला, दवाखाना, मेडिकल, दूध यासह अन्य कारणे सांगून नागरिक घराबाहेर पडत आहेत. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
पद्मावती येथील शेकडो सदनिका असलेल्या सोसायटीमध्ये पाहणी केली असता दूध, भाजीपाला, किराणा या सुविधा घरापोच असतानाही सोसयटीतील अनेक नागरिक जीवनाश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली वीकेंड लॉकडाऊनमध्ये बाहेर पडत असल्याचे सोसायटीच्या गेटवर असलेल्या नोंद वहीत दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे काही सदनिकाधारक फेरफटका मारण्यासाठी, पाळीव प्राण्यांना फिरविण्यासाठी बाहेर पडले असल्याचेही निदर्शनास आले आहे.