मुंबई : अहमदनगरमध्ये घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी काही शक्ती धर्माच्या नावाने अंतर वाढवून दंगली घडवत असल्याचा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी कर्नाटकचं उदाहरण देत तेथेही त्या लोकांनी सत्तेचा वापर करून द्वेष पसरवल्याचा आरोप करत जनतेने त्यांना धडा शिकवल्याचं नमूद केलं आणि भाजपावर हल्लाबोल केला. तसेच कर्नाटकात होऊ शकतं, तर देशातील कोणत्याही राज्यात होईल यासाठी प्रयत्न करणं आपली जबाबदारी असल्याचं मत व्यक्त केले.
आज अहमदनगरमध्ये बोलताना शरद पवार यांनी, “धर्माच्या नावाने अंतर वाढवलं जात आहे. हा नगर जिल्हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो. अनेक ऐतिहासिक काम करणारे मान्यवर या जिल्ह्यात होऊन गेले. याच नगर जिल्ह्यात शेवगावला दोन ते तीन दिवस बाजारपेठ बंद होती.”
“काही शक्ती जाती-जातीत अंतर वाढवून संघर्ष वाढवत आहे. त्या शक्तीशी लढाई करणं, संघर्ष करण्याचं आव्हान माझ्यासह तुमच्यासह सर्वांवर आहे. हे केलं नाही, तर कष्ट करणाऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपण तयारी केली पाहिजे,” असे मत शरद पवारांनी व्यक्त केले.
शरद पवार पुढे म्हणाले, “देशातील चित्र बदलत आहे. काल मी बंगळुरूमध्ये होतो. तिथं नवं सरकार आलं आहे. तिथं अनेक वर्ष काही लोकांचं राज्य होतं. त्या लोकांनी त्यांच्या सरकारच्या काळात माणसांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम केलं. सर्व देशाला वाटत होतं की, कर्नाटकची निवडणूक सत्ताधारी भाजपा जिंकणार. मात्र काल शपथविधी झाला आणि सामान्य माणसाचं सरकार सत्तेत आलं. यावेळी एक लाखापेक्षा अधिक लोक शपथविधीला हजर होते. त्यापैकी ७० टक्के तरुण होते आणि सर्व जातीजमातीमधील होते.”
“कर्नाटकात एक धनगर समाजाचा माणूस मुख्यमंत्री झाला. तो कष्टकरी आहे आणि तेथील लोकांच्या हिताची जपवणूक करतो. अशा लहान जातीवर्गातील व्यक्तीने कर्नाटकात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हे घडलं कारण कष्टकरी लोकांची एकजुट होती. ती एकजुट कर्नाटकात होऊ शकते, तर देशाच्या इतर राज्यातही झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचा हा काळ आहे,” असेही पवारांनी नमूद केले.