नाशिक – महाराष्ट्रात काही संघटना अशा घटनांना खतपाणी घालतात हे योग्य नाही. राज्यातील काही मोजक्या भागात या घटना घडल्या. या प्रवृत्तींना किती महत्त्व द्यायचे, हे लोकांनी ठरवावे. राज्य सरकार चांगले काम करत असताना तीन-चार राज्यांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे जाणीवपूर्वक केले गेले आहे. राज्य सरकार चांगले काम करताना बंदचा निर्णय, नैराश्यातून सामाजिक शांततेला धक्का बसेल असे काम काही राजकीय पक्षांचे घटक करतायत हे दुर्दैवी आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, आम्ही जर ठरवून घेतले आहे की, जुळवून घ्यायचे. त्यामुळे हे सरकार सुरू आहे. आज सरकार जाईल, उद्या जाईल, असे दिवस मोजायचे काम त्यांना करावे लागेल. इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तेव्हा त्यांच्या विरोधातही नेतृत्व नव्हते. मात्र, सगळ्या शक्ती मोरारजी देसाई यांच्या मागे उभ्या राहिल्या. त्यामुळे विरोधी पक्षाकडे चेहरा नाही, असे म्हणता येणार नाही.
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात नक्षलवाद वाढतोय असे नाही. खरोखरंच नक्षलवादी विचार ज्यांनी स्वीकारला तो वेगळा आहे. असा वर्ग फक्त महाराष्ट्रात आहे असे नाही. आदिवासीवर काही अन्याय झाला असेल तर त्यांना नक्षलवादी ठरवता. मात्र, यात संतुलन ठेवायला हवे. माझ्या दृष्टीने केवळ कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही. सोशीत लोकांना मुख्य प्रवाहात आणून बदल घडेल. पोलीस बळाचा वापर करूनच हा प्रश्न सुटेल, असे बोलणे हे असत्य आहे. तिकडे विकास करायला हवा. त्यांना संधी द्यायला हवी, असे त्यांनी सांगितले
केवळ कामगारांचे नुकसान
बंद आणि हिंसाचाराचा फटका सामान्यांना बसतो. एसटी बंदचा निर्णय नैराश्यातून आहे. याबाबत न्यायालयाने देखील स्पष्ट भूमिका दिलेली आहे. त्यामुळे यातून केवळ कामगारांचे नुकसान होत आहे. त्यामुळे मागण्या योग्य असतील तरच त्याची मागणी करावी. मागण्या मान्य करण्यासाठी तुटेल एवढे ताणू नका, असे आवाहनही त्यांनी केले.