कराड – करोना विषाणूमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने सर्व धार्मिक संस्थांकडून सोने परतीच्या बोलीवर कर्जरूपाने घ्यावे आणि त्या बदल्यात 1 ते 2 टक्के व्याज देखील द्यावे, अशी सूचना मी काल केली होती. काही समाज विघातक व्यक्तींनी माझ्या सूचनेचा विपर्यास करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याची खंत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, मी केलेली सूचना ही चालू सरकारी योजनेचाच भाग आहे. अशा प्रकारची योजना पहिल्यांदा प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी 1998 च्या अणु चाचणीच्या पार्श्वभूमीवर 14 सप्टेंबर 1999 साली गोल्ड डिपॉझिट स्कीम या नावाने सुरू केली होती. नोव्हेंबर 2015 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सदर योजनेचे नाव बदलून गोल्ड मोन्टेटिझन 2015 अशी नवी योजना सुरू केली.
योजनेच्या पहिल्या वर्षातच देशभरातील 8 मंदिरांनी त्यांचे सोने विविध बॅंकांमध्ये ठेवले असे अर्थमंत्र्यांनी लोकसभेत सांगीतले.
यामध्ये शिर्डी तसेच तिरुपती या देवस्थानांचा समावेश आहे. नोव्हेंबर 2015 ते 31 जानेवारी 2020 पर्यंत या योजने अंतर्गत 11 बॅंकांमध्ये 20.5 टन सोने जमा झाले आहे. आपल्या देशातील बरेचसे सोने हे व्यवहारात नाही असे वर्ल्ड गोल्ड काऊंसिलचा अहवाल सांगतो. कोव्हिडच्या अभूतपूर्व संकटाला सामोरे जाण्यासाठी देशातील सोन्याचे योग्य नियोजन आणि विनीमय करणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर मी ही सूचना केली होती. परंतु काही व्यक्तींनी आणि विशिष्ट माध्यमांनी याचा विपर्यास करून धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी मी एका विशिष्ट धर्माला केंद्रबिंदू केले आहे असे भासविले. या संदर्भात मी योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणारा असल्याचा इशाराही त्यांनु दिला आहे. आत्तापर्यंत भारतात दोन प्रधानमंत्र्यांनी सोने कर्ज रूपाने घेण्याची योजना राबविली आहे. योगा-योगाने हे दोघेही भारतीय जनता पक्षाचेच आहेत.