राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांना टोला
नाशिक : राज्यात पूर परिस्थितीवरून सुरू असणाऱ्या राजकारणाचा आणखी शेवट झाल्याचा दिसत नाही. कारण आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यात उडी घेतली आहे. राज्यातील परिस्थिती गंभीर असतानाही सरकार चांगले काम करत आहे. मात्र काही जण आम्हीच ज्ञानी आहोत अशा अर्विभावात काम करत असतात असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांना लगावला. ते आज नाशिकमध्ये बोलत होते.
देशाचा स्वातंत्र्य दिन नाशिकमध्ये उत्साहात साजरा झाला. नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी नाशिकचे विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. राज्यात पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे पुरामुळे नुकसान झाले आहे. शेती आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे अशा वेळी सरकार चांगले काम करीत आहे असे सांगून काही विरोधी नेते खूपच ज्ञानी असल्यासारखे वागत असतात, असेही विखे पाटील म्हणाले.